ब्रिटिश वास्तू दर्जा-शिल्पकलेचा उत्तम नमुना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 05:00 IST2020-08-27T05:00:00+5:302020-08-27T05:00:31+5:30
ब्रिटिश जावून ७५ वर्षे लोटत असली तरी त्यांनी आपल्या काळात केलेली बांधकामे आजही सुस्थितीत पहायला मिळत आहेत. यवतमाळ ते धामणगाव रेल्वे मार्गावर नांदुरा येथे ब्रिटिशकालीन पूल आजही कायम आहे. १८८५ मध्ये अर्थात १३५ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी या पुलाचे निर्माण केले होते. परंतु आजच्या वाहतुकीच्या दृष्टीने हा पूल अरुंद ठरत असल्याने दहा वर्षांपूर्वी या पुलाच्या बाजूला पर्यायी नवा पूल उभारला गेला.

ब्रिटिश वास्तू दर्जा-शिल्पकलेचा उत्तम नमुना
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात ब्रिटिशांनी बांधलेल्या इमारती, पूल, कारागृहे, कार्यालये आदी वास्तू गुणवत्ता व शिल्पकलेचा उत्तम नमुना ठरले आहेत. या वास्तू आजही शाबूत असून सार्वजनिक बांधकाम खात्यासाठी दिशादर्शक ठरल्या आहेत.
ब्रिटिश जावून ७५ वर्षे लोटत असली तरी त्यांनी आपल्या काळात केलेली बांधकामे आजही सुस्थितीत पहायला मिळत आहेत. यवतमाळ ते धामणगाव रेल्वे मार्गावर नांदुरा येथे ब्रिटिशकालीन पूल आजही कायम आहे. १८८५ मध्ये अर्थात १३५ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी या पुलाचे निर्माण केले होते. परंतु आजच्या वाहतुकीच्या दृष्टीने हा पूल अरुंद ठरत असल्याने दहा वर्षांपूर्वी या पुलाच्या बाजूला पर्यायी नवा पूल उभारला गेला. परंतु हा जुना पूल आजही पादचारी व दुचाकी वाहनांसाठी अडचणीच्या वेळी वापरला जातो.
आजही ब्रिटिशकालीन पुलांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत केली जाते. यवतमाळात १९१७ ला नगरभवनाचे निर्माण ब्रिटिशांनी केले होते. पुसदचे तहसील कार्यालय ब्रिटिशकालीन इमारतीतच कार्यरत आहे. जिल्ह्यात अशा अनेक ब्रिटिशकालीन इमारती सुस्थितीत असून त्याचा वापरही होतो आहे. अलिकडच्या काळात बांधलेले पूल दर्जा व गुणवत्ता नसल्याने कोसळतात, कित्येक पूल तर उभे राहण्यापूर्वीच कोसळतात. यावरून त्यातील निकृष्टता स्पष्ट होते. मात्र ब्रिटिशकालीन बांधकामे शासनासाठी दिशादर्शक ठरणारी आहेत.
१०३ वर्षांचे नगरभवन
1ब्रिटिशांच्या राजवटीत १९१७ ला यवतमाळ नगरभवनाची निर्मिती करण्यात आली. सीपी अॅन्ड बेरारचे मुख्य आयुक्त बेन्जामीन रॉबर्टसन यांनी या नगरभवनाचे उद्घाटन केले होते. हे नगरभवन उत्कृष्ट शिल्पकलेचा नमुना ठरले आहे. हे नगरभवन पालिकेने सजविले असून सध्याही ते शहराचे मुख्य आकर्षण बनलेले आहेत. आजही तेथे विविध कार्यक्रमांचे केले जाते.
महागावचे दोन्ही पूल महामार्गात कार्यरत
2नागपूर-बोरी-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण सुरू आहे. अनेक ठिकाणी नवे पूल बनविले गेले आहे. परंतु धनोडा व पैनगंगा नदीवर महागानजीकचा पूल कायम ठेवण्यात आले आहे. १९६५ ला बांधकाम खात्याच्या देखरेखीत या पुलांचे निर्माण केले गेले. या मार्गावरील अनेक जुने पूल पाडण्यात आले आणि नव्याने काही पुलांची निर्मिती केली गेली. परंतु धनोडा येथील पूल आजही सुस्थितीत असल्याचा अहवाल कन्सलटंटने दिला आणि तो मान्य करून महामार्ग प्राधिकरणाने हा पूल कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.
रुंझा पूल दुरुस्तीचे बजेट दोन कोटी
3मोहदा-उमरी-करंजी-वणी या प्रमुख राज्य मार्ग क्र. १४ वर मार्गावर रुंंझा येथे ब्रिटिशकालीन दगडी पूल आहे. वाहतुकीच्या सुरक्षेच्या दृष्टीने या पुलाची पुनर्बांधणी करणे आवश्यक असल्याचा अहवाल नागपूर व्हीएनआयटीने स्ट्रक्चरल आॅडिट करून दिला आहे. या पुलाच्या पुनर्बांधणीसाठी आठ कोटी ५० लाख तर दुरुस्तीसाठी दोन कोटी ३९ लाखांचा प्रस्ताव मुख्य अभियंत्यांंना सादर केला गेला. रुंझा येथे वळण रस्ता आहे. पुलावरून जड वाहनांच्या वाहतुकीस प्रतिबंध केला आहे.
१८५७ चे जिल्हा कारागृह
4ब्रिटिशांच्या राजवटीत १८५७ मध्ये यवतमाळ जिल्हा कारागृहाची निर्मिती केली गेली. आजही भक्कम बांधकाम असलेल्या कारागृहाच्या या उत्तुंग भिंती दर्जा व गुणवत्तेची साक्ष देत आहे. १६३ वर्षे जुने हे कारागृह आजही तेवढेच सुरक्षित मानले जाते. आणखी किती तरी वर्षे या कारागृहाच्या बांधकामाला काहीच होणार नाही, असे तेथील यंत्रणा सांगते. जिल्ह्यात ही इमारत बरीच जुनी मानली जाते.
ब्रिटीश देश सोडून जाण्यास पाऊणशे वर्ष लोटत आहे. त्यानिमित्त त्यांच्या काळात बांधल्या गेलेल्या वास्तूंवर हा प्रकाशझोत. ब्रिटीशांनी बांधलेल्या अनेक इमारती, पूल आजही भक्कम स्थितीत आहेत. कित्येक वास्तूंनी तर वयाची शंभरीही ओलांडली आहे. आजही यातील अनेक वास्तू वापरात असून कामाचा दर्जा आणि गुणवत्तेची साक्ष देत आहेत. या वास्तू सार्वजनिक बांधकाम खात्यासाठी दिशादर्शक ठरल्या आहेत.
ब्रिटिशांचा पत्रव्यवहार
यवतमाळ-धामणगाव मार्गावरील नांदुरा येथील पुलाला शंभर वर्षे पूर्ण झाल्यानंतर ब्रिटिश सरकारने याबाबतचा पत्रव्यवहार भारत सरकारला केला होता. पुलाची आयुमर्यादा संपल्याचे सांगितले होते. यावरून ब्रिटिशांच्या अद्यावत अभिलेख्यांची कल्पना येते.
रेल्वे स्टेशन व पूल
ब्रिटिशांनी आपल्या काळात रेल्वे आणली. यवतमाळ-मूर्तीजापूर या नॅरोगेज शकुंतला रेल्वेचे स्टेशन यवतमाळात आहे. या मार्गावर विविध ठिकाणी पूल आहेत. यातील काही शिकस्त झाले असले तरी काही आजही सुस्थितीत आहेत.
वणीत १४६ वर्षे जुनी वास्तू आजही वापरात
वणी येथे १८७४ ला इमारतीचे बांधकाम करण्यात आले. तेथे कारागृह होते. मात्र आज तेथे तहसील व उपविभागीय कार्यालय चालविले जात आहे. पूर्वी वणी हे जिल्ह्याचे मुख्यालय होते. मात्र भौगोलिक दृष्ट्या सोईचे व्हावे म्हणून यवतमाळ हे जिल्ह्याचे मुख्यालय बनविण्यात आले.