बाजारपेठा १७ मेपर्यंत बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 05:00 IST2020-05-06T05:00:00+5:302020-05-06T05:00:43+5:30
कोरोनाची ही लढाई जिंकून यवतमाळ जिल्ह्याला रेड झोनमधून ग्रीन झोनमध्ये आणायचे आहे. एवढे दिवस कळ काढली आता आणखी ११ दिवस थांबा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. त्यांच्या आवाहनानुसार १७ मेपर्यंत यवतमाळ जिल्ह्यातील सर्व दुकाने, प्रतिष्ठाने बंद ठेवली जाणार असल्याची माहिती चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अरुणभाई पोबारू यांनी ‘लोकमत’ला दिली.

बाजारपेठा १७ मेपर्यंत बंदच
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : तिसरा लॉकडाऊन संपायला आता केवळ ११ दिवस आहेत. त्यामुळे या काळात संयम ठेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, आपली प्रतिष्ठाने बंदच ठेवावीत, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड व जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी केले. या आवाहनाला चेंबर ऑफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्रीजच्या पदाधिकाऱ्यांनी लगेच प्रतिसाद देत १७ मेपर्यंत आपली दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र यातून बोअरवेल आणि मोबाईल दुरुस्तीला सवलत देण्यात आली आहे. विशेष असे यवतमाळात दारूची दुकानेही बंदच राहणार आहे.
उद्योग-व्यापार व व्यवसायातील बंदी उठवावी का या मुद्यावर चर्चा करण्यासाठी मंगळवारी चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांची ना. संजय राठोड यांनी बैठक बोलविली होती. या बैठकीला आमदार मदन येरावार, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील महिंद्रीकर, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अरुणभाई पोबारू, उपाध्यक्ष राजेंद्र निमोदिया, राजेंद्र जैन, संजय अग्रवाल, राधाकृष्ण जाधवाणी, महेश मुंधडा आदी उपस्थित होते. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली.
व्यापाºयांच्या मागण्यांवर आमदार मदन येरावार म्हणाले, कोरोनाची लक्षणे दिसत नाही, त्यामुळे दुकानात येणाºयांना कसे ओळखणार, गर्दी झाली तर दुकान मालक व इतरांनाही धोका होऊ शकतो, कोरोना संसर्गाची ही साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन संपेपर्यंत संयम ठेवणेच योग्य ठरेल.
कोरोनाची ही लढाई जिंकून यवतमाळ जिल्ह्याला रेड झोनमधून ग्रीन झोनमध्ये आणायचे आहे. एवढे दिवस कळ काढली आता आणखी ११ दिवस थांबा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. त्यांच्या आवाहनानुसार १७ मेपर्यंत यवतमाळ जिल्ह्यातील सर्व दुकाने, प्रतिष्ठाने बंद ठेवली जाणार असल्याची माहिती चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अरुणभाई पोबारू यांनी ‘लोकमत’ला दिली. अत्यावश्यक सेवेची व प्रशासनाने सूट दिलेली दुकाने मात्र नियोजित वेळेत सुरू राहणार आहे. बोअरवेल खोदण्याला मंजुरी देण्यात आली आहे. तर मोबाईल दुरूस्तीच्या दुकानालाही मंजुरी मिळाली आहे.
व्यापाºयांकडून करांची वसुली करण्यास विरोध
शासनाच्या सूचनांचे पालन करून जीवनावश्यक वस्तूंसोबत इतरही दुकाने सुरू करण्याची परवानगी द्यावी, एमआयडीसीमध्ये तीन पाळीत उद्योग सुरू करता यावे, व्यापाऱ्यांचे नुकसान झाल्याने पुढील काही महिने व्यापाऱ्यांकडून कर वसुली करू नये आदी मागण्या चेंबरच्यावतीने ठेवण्यात आल्या.
पालकमंत्री म्हणाले, आणखी केवळ ११ दिवस द्या
पालकमंत्री संजय राठोड यांनी कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी आणखी ११ दिवस द्या, अशी विनंती केली. दीड महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे उद्योग, व्यापार, व्यवसाय बंद आहेत. आता ११ दिवसांसाठी दुकाने उघडल्यास कोरोनाचा पुन्हा संसर्ग होण्याची भीती आहे. परजिल्ह्यातून आणि परराज्यातून मजुरांचे लोंढे मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात येत आहेत. नागरिकांची गर्दी बाजारात मोठ्या प्रमाणात उसळत आहे. अशा स्थितीत कोरोनाचा प्रकोप वाढू शकतो.