अनेकांनी उघडला पाणी विक्रीचा व्यवसाय

By Admin | Updated: May 30, 2014 00:27 IST2014-05-30T00:27:01+5:302014-05-30T00:27:01+5:30

यावर्षी अतवृष्टी होऊनसुद्धा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाच्या नियोजनाअभावी शहरात मोठय़ा प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. एकीकडे पाण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांची भटकंती सुरू आहे

Many opened the business of selling water | अनेकांनी उघडला पाणी विक्रीचा व्यवसाय

अनेकांनी उघडला पाणी विक्रीचा व्यवसाय

यवतमाळ : यावर्षी अतवृष्टी होऊनसुद्धा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाच्या नियोजनाअभावी शहरात मोठय़ा प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. एकीकडे पाण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांची भटकंती सुरू आहे तर दुसरीकडे पाण्याची विक्रीचा व्यवसाय तेजीत आला असल्याचे दिसून येते. विविध माध्यमांद्वारा ही विक्री सुरू आहे. नागरिकांच्या असहायतेचा लाभ उचलत अनेकांनी पाणी विक्रीच्या व्यवसायातून मोठय़ा प्रमाणात कमाई सुरू केली आहे.
जीवन प्राधिकरणाकडून सात ते आठ दिवस नळ सोडल्या जात नाही. ज्या दिवशी नळ सोडण्यात येते त्या दिवशी अनेकांच्या घरापर्यंत पाणी पोहचण्याआधीच नळ जातात. तर अनेकांकडील नळाला फोर्स राहत नसल्यामुळे नळ जाईपर्यंंत त्यांना केवळ दोन ते तीन गुंडच पाणी मिळते. अशावेळी जिथे कुठे पाणी मिळत असेल, अशा ठिकाणाहून ते विकत घेण्यावाचून पर्याय उरत नाही. नागरिकांची हिच मजबुरी पाहता ज्यांच्याकडे पाणी आहे ते पाण्याच्या गुंडाप्रमाणे  विक्री करतात. अशावेळी वर्षभर्‍याचे कोणतेही संबंध, शेजारधर्म आता पाळल्या जात नसल्याचेच दिसून येते.
शहरातील तलाव फैल, पिंपळगाव, बांगरनगर, अंबिकानगर आदी अनेक परिसरात मोठय़ा प्रमाणात पाणीटंचाई असून नळाच्या दिवशी या   परिसरातील एक-दोन लोकांकडेच पाणी पोहोचते. इतरांकडे पाणी पोहचत नाही, अशावेळी ज्यांच्याकडे नळयोजनेच्या नळाचे पाणी पोहचते ते स्वत:कडील पाणी भरणे झाल्यावर परिसरातील इतरांना पाणी गुंडाप्रमाणे विकतात. १ रुपयांपासून पाच रुपये गुंडाप्रमाणे हे पाणी नागरिकांना विकत घ्यावे लागगते. परंतु कोणताही पर्याय नसल्याने नागरिक पाणी विकत घेतात.
शहरातील बहुतांश बोअरवेल, विहिरी आटल्या आहेत. फारच कमी लोकांकडे विहिरींना व बोअरवेलला पाणी असते. त्यामुळे अशा लोकांकडूनसुद्धा पाणीटंचाईच्या परिसरात मोठय़ा प्रमाणात पाणी विक्री करून पैसे कमविणे सुरू आहे.
अनेकांकडे विवाह व इतर समारंभांची सध्या रेलचेल आहे. परंतु पाण्याअभावी मोठे संकट अशा ठिकाणी उभे ठाकते. अशावेळी          केवळ पाण्यासाठी विवाहाची          तारीख रद्द करणे शक्य होत नाही. त्यामुळे पाण्याचे टँकरच बोलाविण्यात येते.
पाण्याच्या टाकीच्या कमी-अधिक क्षमतेनुसार हे टँकर शहरात सध्या उपलब्ध आहे. तीनशे रुपयांपासून सात-आठशे रुपये यासाठी मोजावे लागतात. परंतु ज्यांच्याकडे विवाह समांरभासारखे कार्यक्रम आहे, त्यांना हे टँकर बोलवावेच लागत आहे. त्यातही पाणी साठवण करण्याचा मोठा प्रश्न निर्माण होतो. चार ते पाच हजार लिटर्स पाणी घरात साठवण करण्यासाठी पर्यायी     साधने नसतात. अशावेळी बिछायत केंद्रांमधून प्लास्टिकचे ड्रम भाड्याने आणावे लागते. या ड्रमचे भाडेसुद्धा सहन करावे लागते. अशा पद्धतीने सध्या टँकर मालकांचा व बिछायत केंद्र चालकांचाही व्यवसाय चांगलाच तेजित आहे.
अनेक अँटोरिक्षा, सायकल रिक्षा व मालवाहू इतर छोट्या वाहनांमधून घरपोच अथवा कार्यक्रमस्थळी पाणी पोहचविले जाते. त्यामुळे इतर वेळी फारसी मिळकत नसलेल्या अशा वाहनचालकांना आता पाण्यामुळे चांगला रोज पडत असल्याचे दिसून आले. ज्यांना टँकर परवडत नाही आणि पाण्याची दुसरी कोणतीही सोय ज्यांच्याकडे नाही, असे नागरिक अँटोरिक्षा, सायकल रिक्षा व इतर छोट्या वाहनातून पाणी विक्री करणार्‍यांना प्राधान्य देतात.
बिसलेरी, पाणीपाऊच व मोठय़ा कॅनद्वारा शुद्ध पाणी विक्रीचा व्यवसाय तर सध्या अतिशय तेजीत आहे. या व्यवसायातून जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. ग्रामीण भागात तर अशा व्यवसायातून  अनेक ठिकाणी मोठय़ा प्रमाणात लूट सुरू असल्याचे दिसून येते. बिसलेरीच्या १५ ते १८ रुपये एमआरपी असलेल्या बॉटल्स २0 ते २५ रुपये घेऊन ग्राहकांच्या माथी मारल्या जात आहेत. कधी चिल्लर नसल्याचे कारण सांगितले जाते तर कधी कुलिंग चार्जच्या नावाखाली ग्राहकांना गंडविल्या जाते. गळा सुकलेला असताना आणि पाण्याची तीव्र गरज असलेला ग्राहक याकडे दुर्लक्ष करून दोन-चार रुपये कुठे नाही जात, असे म्हणून निघून जातात. परंतु प्रत्येक ग्राहकाकडून दोन ते दहा रुपयांची लूट करणारे अनेक व्यवसायी दररोज हजारो रुपये केवळ लुटीतून कमवितात. यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. ग्राहकसुद्धा तक्रार करण्याच्या मनस्थितीत नसतात. याचाच फायदा हे व्यावसायिक घेत असल्याचे दिसून येते.
अशा पद्धतीने एकीकडे पाणीटंचाईने कळस गाठला असताना दुसरीकडे मात्र या टंचाईतही लोकांची लूट करून पाणी विक्रीचा व्यवसाय थाटून आपले उखळ पांढरे करून घेणार्‍यांची संख्यासुद्धा कमी नाही. कोणतीही माणुसकी न जपता स्वत:च्या स्वार्थासाठी अनधिकृतपणे पाणी विक्री करणार्‍यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनाकडे कोणतीही सक्षम यंत्रणा नाही. याचाच फायदा घेऊन अनेकांनी आपले खिसे भरणे सुरू केले आहे. (प्रतिनिधी)
 

Web Title: Many opened the business of selling water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.