मनदेव तलाव गाळाने भरला
By Admin | Updated: June 4, 2017 01:11 IST2017-06-04T01:11:21+5:302017-06-04T01:11:21+5:30
आर्णी मार्गावरील मनदेव आणि हिवरी दरम्यान असलेला मनदेव तलाव गाळाने भरला आहे. मागील ४५ ते ५० वर्षांपासून या तलावाचे खोलीकरणच झाले नाही.

मनदेव तलाव गाळाने भरला
लोकमत न्यूज नेटवर्क
हिवरी : आर्णी मार्गावरील मनदेव आणि हिवरी दरम्यान असलेला मनदेव तलाव गाळाने भरला आहे. मागील ४५ ते ५० वर्षांपासून या तलावाचे खोलीकरणच झाले नाही. या तलावाची साठवण क्षमता कमी झाल्याने उन्हाळ्यात केवळ डबके राहातात. परिणामी सिंचन आणि वन्य प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या तलावाची साठवण क्षमता केवळ २५ ते ३० टक्के राहिली आहे. हा तलाव घाटाखाली असल्याने वन्यजीवांना महामार्ग ओलांडून तलावावर जावे लागत नाही. त्यामुळे अपघात होत नाही. वेळोवेळी डागडुजी आणि खोलीकरणाचे काम झाल्यास हा तलाव आजही सिंचन, वन्य प्राण्यांची तहान भागविण्यासाठी उपयोगी पडतो.
या तलावातून जवळपास २०० हेक्टर सिंचन क्षमता निर्मितीच्यावेळेस निश्चित करण्यात आली होती. प्रत्यक्षात थोड्याफार क्षेत्रातच सिंचन शक्य झाले. लाखो रुपये खर्च करून तयार झालेला हा तलाव नामशेष होण्यापूर्वी त्याचे पुनरूज्जीवन करणे काळाची गरज आहे. तलावाचे खोलीकरण करून योग्य सुशोभीकरण केल्यास पर्यटन विकासालाही वाव आहे. या माध्यमातून वनविभागाला उत्पन्नाचा एक नवीन स्रोतही मिळू शकतो. तलावावर विविध तसेच विदेशी पक्षीसुद्धा आढळल्याच्या नोंदी काही पक्षीप्रेमींकडे आहेत. या सर्व बाबी डोळ्यासमोर ठेवून तलावाच्या विकासाची गरज निर्माण झाली आहे.
वनविभागाने नाकारली परवानगी
सिंचनासाठी संजीवनी ठरत असलेल्या या तलावाची खोली वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वखर्चाने गाळ काढण्याचा निर्णय घेतला. मात्र वनविभागाने याला परवानगी नाकारली. विकासाच्यादृष्टीने लोकांनी पुढाकार घेतलेल्या कामातही वनविभागाकडून नियम दाखविले जात आहे. याविषयी नागरिकांमध्ये रोष आहे.