स्वत:ला विविध आव्हाने पेलविण्यायोग्य बनवा
By Admin | Updated: April 29, 2016 02:32 IST2016-04-29T02:32:36+5:302016-04-29T02:32:36+5:30
स्वत:ला विविध आव्हाने पेलविण्यायोग्य बनवा, स्वत:ची क्षमता सिद्ध करा, व्यक्तीने स्वत:ला परिपूर्ण केल्यास अशा व्यक्तींना कुणाकडेही कशासाठी हात पसरवावे लागत नाही ...

स्वत:ला विविध आव्हाने पेलविण्यायोग्य बनवा
सोमाभाई मोदी : राज्यस्तरीय तेली समाज आत्मचिंतन शिबिर
यवतमाळ : स्वत:ला विविध आव्हाने पेलविण्यायोग्य बनवा, स्वत:ची क्षमता सिद्ध करा, व्यक्तीने स्वत:ला परिपूर्ण केल्यास अशा व्यक्तींना कुणाकडेही कशासाठी हात पसरवावे लागत नाही तर त्यांच्याकडे स्वत:हून संधी चालत येतात, तेंव्हा प्रत्येक क्षणाचा उपयोग घेत क्रियाशिल व्हा, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ज्येष्ठ बंधू व तेली समाजाचे राष्ट्रीय नेते सोमाभाई मोदी यांनी केले. ते बुधवारी येथील शिवाजी मैदानावर आयोजित राज्यस्तरीय तेली समाज आत्मसन्मान चिंतन शिबिरात विशेष पाहुणे म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष संध्याताई सव्वालाखे होत्या. तर स्वागताध्यक्ष म्हणून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून सोमाभाई मोदी यांचे सहकारी आणि तेली समाजाचे नेते निरंजन राठोड, वर्ध्याचे माजी खासदार सुरेश वाघमारे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष ढवळे, नितीन पवाने, मंगेश रुईकर, रमेश पिसे, राजेंद्र पडोळे, नितीन पवाने, माधव घुसे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
आपल्या भाषणातून सोमाभाई मोदी यांनी विविध सामाजिक विषयांना हात घातला. त्यामध्ये त्यांनी शिक्षणावर भर दिला. मुलगा व मुलगी दोघांनाही शिकवा. परंतु केवळ नोकरी मिळविण्याच्या हेतुने शिकवू नका तर त्यांना त्यांच्या पायावर उभे होता येईल, या हेतुने शिकवा. सुशिक्षित व्यक्ती कोणताही छोटा-मोठा व्यवसाय करेल तरी तो त्यामध्ये काहीतरी वेगळेपण सिद्ध करून दोन पैसे अधिक कमावितो. शिक्षणाचा उपयोग सर्वच स्तरावर होतो. कोणतेही काम छोटे किंवा मोठे नसते तर तुम्ही ते कशापद्धतीने करता, यावर तुमचे यश अवलंबून असल्याचे ते म्हणाले.
मुलांना शिक्षणासोबतच चांगले संस्कार देणेही गरजेचे असल्याचे ते म्हणाले. तेली समाजामध्ये दोन गुण सर्वत्र दिसून येतात. ते म्हणजे काटकसर आणि प्रामाणिकपणा. या गुणांच्या आधारे हा समाज निश्चितच भविष्यात चांगली प्रगती करेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. संघटीत होऊन कार्य करा, शासनाच्या विविध जनपयोगी योजनांचा लाभ घ्या व इतरांनाही द्या, असे आव्हानसुद्धा त्यांनी यावेळी केले. समाजाने माझ्यासाठी काय केले त्यापेक्षा मी समाजासाठी काय करतो, ही भूमिका महत्वाची असल्याचेही सोमाभाई मोदी यांनी सांगितले. यावेळी विविध मान्यवरांनीसुद्धा विचार व्यक्त केले.
यशस्वीतेसाठी ज्ञानेश्वर रायमल, अशोक कारमोरे, वसंत भुराणे, रत्नाकर पजगाडे, ज्ञानेश्वर झाडे, संदीप गुल्हाने आदींसह अनेक तेली समाज बांधवांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)