जिल्ह्याची मुख्य बाजारपेठ बंदच राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 05:00 IST2020-05-13T05:00:00+5:302020-05-13T05:00:42+5:30
निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, बुधवारपासून यवतमाळ शहरासह जिल्हाभरातील मुख्य बाजारपेठेतील सर्व प्रमुख दुकाने बंद राहतील. पाच दुकाने सुरु ठेवण्याचा निकष हा गल्लीबोळातील दुकानांसाठी राहणार आहे. मुख्य बाजारपेठेतील जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना मात्र यातून सूट राहील. प्रशासनाने दिलेल्या वेळापत्रकानुसार ही दुकाने सुरू ठेवता येणार आहे.

जिल्ह्याची मुख्य बाजारपेठ बंदच राहणार
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यातील दुकाने ८ ते २ या वेळात सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. परंतु मंगळवारी खरेदीसाठी प्रचंड गर्दी झाल्याने कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढण्याच्या भीतीने हा निर्णय मागे घेण्यात आला आहे.
निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, बुधवारपासून यवतमाळ शहरासह जिल्हाभरातील मुख्य बाजारपेठेतील सर्व प्रमुख दुकाने बंद राहतील. पाच दुकाने सुरु ठेवण्याचा निकष हा गल्लीबोळातील दुकानांसाठी राहणार आहे. मुख्य बाजारपेठेतील जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना मात्र यातून सूट राहील. प्रशासनाने दिलेल्या वेळापत्रकानुसार ही दुकाने सुरू ठेवता येणार आहे. लॉकडाऊन काळात दुकाने केव्हा सुरू करायची, त्याचा वेळ काय याबाबत प्रशासनाकडून सातत्याने आदेशात फेरबदल होत असल्याने यवतमाळ शहर व जिल्हाभरातील व्यापारी, व्यावसायिक व नागरिकांमध्येसुद्धा प्रचंड संभ्रमाची स्थिती आहे. पाच दुकानांबाबतही असाच संभ्रम निर्माण झाला होता. परंतु सायंकाळी निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हांडे यांनी हा संभ्रम दूर करीत पाच दुकानांचा निकष मुख्य बाजारपेठेसाठी नसल्याचे स्पष्ट केले. अर्थात मुख्य बाजारपेठेतील सर्व दुकाने (जीवनावश्यक वस्तू वगळता) बंदच राहणार आहे. बाजारपेठ उघडल्यानंतर अचानक उसळणारी गर्दी हे प्रमुख कारण त्यासाठी प्रशासनाने सांगितले आहे. प्रशासनाच्या या स्पष्टतेमुळे यापूर्वी कोणत्या प्रकारच्या दुकानाला कोणत्या दिवशी सुरु ठेवण्याची मुभा राहील हा मुख्य बाजारपेठेसाठी (गल्लीबोळातील दुकाने वगळता) आदेशही रद्द ठरला. प्रशासनाकडून आदेशात आणखी स्पष्टता अपेक्षित आहे.
दूध विक्रीला सकाळी व सायंकाळी मुभा
दूध विक्रीला पूर्वी केवळ सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेतच परवानगी होती. आता सकाळी व सायंकाळी दूध विक्री करता येणार आहे. सकाळी ८ ते २ व सायंकाळी ६ ते ८ या वेळेत फिरून विक्री करता येईल.