जमिनीतील मुख्य घटक नामशेष
By Admin | Updated: September 25, 2014 23:35 IST2014-09-25T23:35:37+5:302014-09-25T23:35:37+5:30
आधुनिक युगात नवनवीन तंत्र वापरून कृषी विभागाने पिकांचे उत्पन वाढविण्याकरिता प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र उत्पादन वाढीसाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खताचा वापर करण्यात येत असल्याने

जमिनीतील मुख्य घटक नामशेष
रासायनिक खताचा परिणाम : शेती बंजर होण्याची भीती
गणेश रांगणकर -नांदेपेरा
आधुनिक युगात नवनवीन तंत्र वापरून कृषी विभागाने पिकांचे उत्पन वाढविण्याकरिता प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र उत्पादन वाढीसाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खताचा वापर करण्यात येत असल्याने जमिनीतीत मुख्य पोषक तत्वेच आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी शेती बंजर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पूर्वी शेतकरी शेती व्यवसायाबरोबर गाय, म्हैस, बैल, शेळ्या आदी पाळीव जनावरे पाळत होते. या पाळीव जनावरांची विष्ठा शेतीसाठी उपयोगी येत होती. या जनावरांची विष्ठा शेणखत म्हणून शेतीकरिता उपयोगी पडत होती. जनावरांची विष्ठा खताचे काम करीत होती. हे शेणखत जमिनीसाठी अत्यंत पोषक ठरत होते. या खतापासून शेतजमिनीतील पोषक तत्वांना कोणतीही हानीसुद्धा पोहोचत नव्हती़ पूर्णपणे निरोगी पिकांपासून शेतकऱ्याला भाजीपाला व इतरही पिके घेत येत होती. त्यामुळे उत्पादनचा दर्जा अत्यंत चांगला राहात होता.
यापूर्वी शेतकरी खंडीचा हिशेब लावून, खंडीने उत्पन्न झाले, अशी चर्चा करीत होते़ वयोवृध्द शेतकरी गावातील चौथऱ्यावर बसून उत्पादनाबाबत चर्चा करीत होते. पिकांवर कोणतेही संकट आले, की शेतकरी आपसात चर्चा करून त्यावर उपाययोजना करीत होते़ परंतु हल्लीच्या काळात तसे चित्र दिसून येत नाही. पिके चांगली राहण्याकरिता आता शेतकरी अधिकाधिक रासायनिक खताचा वापर करताना दिसत आहे़ त्यामुळे शेतजमिनीचा दर्जा घसरत आहे. जमिनीतील अत्यंत सुपिक तत्वे नष्ट होत आहे़
आता शेतकरी रासायनिक खताचा वापर जादा प्रमाणात करीत असल्याने उपजाऊ शेतजमिनी ओसाड पडण्याची शक्यता बळावली आहे़ शेतीत अधिकाधिक उत्पन्न घेण्याकरिता रासायनिक खतासोबतच अनेक प्रकारच्या महागड्या किटकनाशकांचाही अत्याधिक वापर होऊ लागला आहे. या किटकनाशकांमुळे शेतीतील ज्या वनस्पती पिकासाठी उपयोगी ठरतात, त्या वनस्पती व पोषक तत्वे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. किटकनाशकांच्या फवारणीमुळेत्यांना धोका निर्माण झाला आहे. वारंवार आणि अधिक रासायनिक खताच्या वापरामुळे शेतजमिनीलाही आता रासायनिक खतांची सवय झाली आहे़
आधुनिक काळात पिकांना रासायनिक खताचा डोज दिला नाही, तर उत्पादनात घट होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी त्यांचा वारेमाप वापर करताना दिसत आहे. अधिक उत्पन्नासाठी त्यांच्याकडे दुसरा पर्यायही नाही. सिंचनाची सुविधा अत्यंत तोकडी आहे. यापूर्वी शेतकरी कोरडवाहू शेतात ‘वांगोडे’ तयार करून त्यामध्ये भाजीपाला लागवड करायचे़ त्याच भाजीपाल्यावर त्यांचा घरगुती खर्च अवलंबून असायचा. परंतु हल्लीच्या काळात मात्र कोरडवाहू शेतातून हे वांगोडे नष्टच झाले आहे़ अवेळी पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांनी कोरडवाहू शेतात भाजीपाला लावणेच बंद केले आहे़ आता तर शेतकरी, मजुरदारांसह सर्वच जनता रासायनिकयुक्त भाजीपाला खात आहे़ नवीन किटकनाशकांतील विषारी घटक भाजीपाल्यात मिसळत असल्यामुळे अनेक रोगांना आमंत्रण मिळत आहे. आता खास किटकनाशक निघाले. सोबतच शेतातील कचरा नष्ट करणारी औषधी आली आह़े त्यात जंगली जनावरांच्या हैदोसामुळे शेतकरी त्रस्त असल्याने ही जंगली जनावरे शेतात येऊ नये म्हणूनही अनेक शेतकरी खास औषधींची फवारणी करीत आहे. हे औषध धुऱ्याने फवारल्यास कोणतेही जनावरे शेतात शिरणार नाही, असा शेतकऱ्यांचा समज आहे़