महावितरणचा अजब कारभार

By Admin | Updated: March 11, 2015 01:59 IST2015-03-11T01:59:01+5:302015-03-11T01:59:01+5:30

महावितरणचा अजब कारभार नेहमीच चव्हाट्यावर येतो. देयकाच्या भाराने ग्राहक आधीच वैतागले आहे. त्यातच या महिन्यात तारीख उलटून गेल्यानंतर देयकांचे वाटप करण्यात ...

Mabhavitaran's unique management | महावितरणचा अजब कारभार

महावितरणचा अजब कारभार

वणी : महावितरणचा अजब कारभार नेहमीच चव्हाट्यावर येतो. देयकाच्या भाराने ग्राहक आधीच वैतागले आहे. त्यातच या महिन्यात तारीख उलटून गेल्यानंतर देयकांचे वाटप करण्यात आल्याने बहुतांश वीज ग्राहकांवर नाहक आर्थिक भुर्दंड बसला आहे.
दर महिन्याला महावितरणतर्फे ग्राहकांना वीज देयक पाठविण्यात येते. त्यात देयक भरण्याची अंतिम तारीख दिलेली असते. ही अंतिम तारीख उलटून गेल्यानंतर किमान चार दिवसानंतर दंड आकारून वाढीव देयक भरण्याची मुभा दिली जाते. त्या तारखेनंतरही ग्राहकांनी देयक न भरल्यास त्यांना पुन्हा जादा भुर्दंड देऊन देयक भरण्याची मुभा दिली जाते. प्रथम १0 ते ३0 रूपये आणि नंतर चक्क १00 ते १५0 रूपयांपर्यंत भुर्दंड सहन करून ग्राहकांना वीज देयक भरता येते. फेब्रुवारी महिन्याचे वीज देयक आज मंगळवारी बहुतांश ग्राहकांच्या हाती पडले. या देयकात ९ मार्चपर्यंत देयक भरण्याची तारीख देण्यात आली. मात्र हे देयक आज १0 मार्चला ग्राहकांना वाटप करण्यात आले आहे. ९ मार्चपर्यंत ठरावीक रक्कम होती. त्यानंतर आता ग्राहकांना वाढीव रकमेसह हे देयक भरावे लागणार आहे. यात ग्राहकांची कोणतीही चूक नाही. महावितरणनेच त्यांना एक दिवस उशिरा देयक वाटप केले आहे. मात्र त्याचा नाहक भुर्दंड आता ग्राहकांवर बसणार आहे. यातून महावितरणला लाखो रूपयांचा लाभ होणार आहे. मंगळवारी १0 मार्चला वाटप करण्यात आलेल्या देयकांवर अंतिम तारीख ९ मार्च दर्शविण्यात आली. त्यानंतर १३ मार्चपर्यंत ग्राहकांना वाढीव रकमेसह देयक भरता येणार आहे. सोबतच १३ मार्च उलटून गेल्यानंतरही पुन्हा वाढीव रकमेसह ग्राहकांना देयक भरता येणार आहे. ही बाब जरी खरी असली, तरी यात ग्राहकच भरडले जात आहे. त्यांची कोणतीही चूक नसताना त्यांना नाहक जादा भुर्दंड सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे देयक मिळताच महावितरणचे कर्मचारी ते भरण्यासाठी तगादा लावतात. विहित तारखेपर्यंत देयक न भरल्यास वीज जोडणी कापण्याची धमकी दिली जाते.
बहुतांश महिन्यात असाच प्रकार सुरू आहे. त्याचा फटका सर्वच ग्राहकांना बसत आहे. त्यासाठी आता महावितरणतर्फे देयक आॅनलाईन झाल्याचे सांगून चक्क ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. आॅनलाईन सुविधा ग्रामीण भागातील ग्राहकांना कुचकामी ठरत आहे. त्यांच्याकडे इंटरनेटच नाही. त्यामुळे आनलाईन देयक भरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ज्यांच्याकडे इंटनरनेट आहेत, असेही बहुतांश ग्राहक या पद्धतीचा वापर करीतच नाही. मात्र महातिवरणला यातून दरमहा लाखोंचा मलिदा सहज मिळत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Mabhavitaran's unique management

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.