दारव्हा तालुक्यात केळी बागांचे नुकसान
By Admin | Updated: August 8, 2015 02:40 IST2015-08-08T02:40:24+5:302015-08-08T02:40:24+5:30
जोरदार वाऱ्यासह आलेल्या पावसाचा फटका दारव्हा तालुक्यातील केळीच्या बागांना बसला आहे.

दारव्हा तालुक्यात केळी बागांचे नुकसान
दारव्हा : जोरदार वाऱ्यासह आलेल्या पावसाचा फटका दारव्हा तालुक्यातील केळीच्या बागांना बसला आहे. सुमारे ५० एकरावरील केळीचे पीक उद्ध्वस्त झाले असून, गणेशपूर, बिजोरा, कुंभारकिन्ही, किन्ही वडकी, टाकळी बोथ, गाजेपूर या गावांना फटका बसला.
तालुक्यात ४ आॅगस्टच्या रात्री वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसाने केळीचे पीक उद्ध्वस्त झाले. दारव्हा तालुक्यातील शेतकरी अलिकडे केळी पिकाकडे वळले आहे. या केळीचे योग्य संगोपनही करण्यात आले. मात्र वादळाने केळीची झाडे मुळासकट उन्मळून पडली आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. कृषी विभागामार्फत केळी पिकाच्या लागवडीसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते. परंतु दारव्हा तालुक्यात लक्षांक नसल्याने हे शेतकरी अनुदानापासूनही वंचित राहिले. विशेष म्हणजे विविध पिकांचा विमा काढता येतो, मात्र केळी पिकाचा त्यात समावेश नसल्याने यापासूनही वंचित राहावे लागत आहे. यासंदर्भात गणेशपूर येथील शाम गावंडे यांनी कृषी मंत्र्याकडे निवेदन पाठविले.
त्यानंतर नुकसानग्रस्त केळीची पाहणी करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी पुरूषोत्तम अनगाई, आत्माचे तालुका तंत्रज्ञ जीवन जाधव
यांच्या चमुने पाहणी केली. नुकसानीचा अहवाल वरिष्ठांना कळविणार असल्याचे त्यांना सांगितले. (प्रतिनिधी)