‘पीआरसी’साठी लगबग
By Admin | Updated: June 30, 2016 02:30 IST2016-06-30T02:30:20+5:302016-06-30T02:30:20+5:30
पंचायत राज समिती (पीआरसी) आॅगस्ट महिन्यात यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे.

‘पीआरसी’साठी लगबग
कळंब पंचायत समिती : आॅगस्टपर्यंत माहिती अपडेट करणे सुरू
कळंब : पंचायत राज समिती (पीआरसी) आॅगस्ट महिन्यात यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यामुळे आतापासूनच स्थानिक पंचायत समितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची माहिती अपडेट करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे.
अनेक आमदारांचा समावेश असलेल्या या समितीमधील काही सदस्यांची कळंब पंचायत समितीला भेट ठरलेलीच असते. आता राज्यात भाजप-सेनेची सत्ता आहे. १९९५ नंतर पहिल्यांदाच भाजपा-सेनेच्या कार्यकाळात ही पंचायत राज समिती येत आहे. याची काही कर्मचाऱ्यांनी आतापासूनच धास्ती घेतली आहे. तालुक्यातील कुठल्याही कर्मचाऱ्यावर कारवाई होऊ नये, यासाठी सर्व ठिकठाक करण्याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रित केले आहे.
समितीकडून लेखा आक्षेप, शाळा, अंगणवाडी, बांधकाम, आरोग्य, समाजकल्याण, कृषी, सामान्य प्रशासन, शिक्षण, ग्रामपंचायत, शालेय पोषण आहार आदी बाबींची तपासणी केली जाते. लेखा परीक्षण अहवालातील त्रुटी अनुपालन तपासणी हे या समितीचे मुख्य लक्ष्य असते. त्यामुळे सर्व बाबी व्यवस्थित करून ठेवण्यावर भर दिला जात आहे. समितीला सामोरे जाण्यासाठी कुठल्याही उणिवा राहणार नाही, याची दक्षता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून घेतली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)