जिल्हाभर वृक्षारोपणाची लगबग
By Admin | Updated: July 2, 2016 02:41 IST2016-07-02T02:41:14+5:302016-07-02T02:41:14+5:30
शासनाच्या दोन कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत जिल्हाभर शुक्रवारी वृक्षारोपण मोहिमेची लगबग दिसत होती.

जिल्हाभर वृक्षारोपणाची लगबग
प्रचंड प्रतिसाद : यवतमाळच्या जनकनगरीत मुख्य सोहळा
यवतमाळ : शासनाच्या दोन कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत जिल्हाभर शुक्रवारी वृक्षारोपण मोहिमेची लगबग दिसत होती. विविध कार्यक्रमांचे आयोजन करून ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. जिल्ह्याचा मुख्य वृक्षारोपणाचा कार्यक्रम यवतमाळच्या जनकनगरीतील प्रस्तावित वन उद्यानात पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत पार पडला.
यवतमाळ जिल्ह्यात १५ लाख ५० हजार वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट आहे. यासाठी गत महिन्याभरापासून सामाजिक संघटनांच्या माध्यमातून प्रशासन जनजागृती करीत आहे. शुक्रवारी या मोहिमेला यवतमाळातून प्रारंभ झाला. येथील जांब मार्गावरील जनकनगरीत वनविभागाच्या प्रस्तावित वन उद्यानात पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी खासदार भावना गवळी, आमदार मदन येरावार, आमदार डॉ. अशोक उईके, पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, मुख्य वनसंरक्षक वसंत गुरमे, जिल्हा परिषदेच्या सभापती लता खांदवे, उपवनसंरक्षक प्रमोदचंद लाकरा, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुळकर्णी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सुरेश शहापुरकर, सामाजिक वनिकरणचे उपसंचालक एम.आर. चेके उपस्थित होते. यासोबतच दारव्हा येथील वन उद्यान, दारव्हा तालुक्यातीलच देऊळगाव राजा, दिग्रस तालुक्यातील भवानी टेकडी, लोहारा एमआयडीसी येथे वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपणासाठी जिल्हाभर विविध सामाजिक संघटना पुढे आल्या होत्या. शाळा, महिाविद्यालये, सामाजिक संघटना, एनसीसीचे विद्यार्थी, महिला, पुरूष स्वयंस्फुर्तीने सहभागी झाले होते. पुसद शहरात सायकल रॅली काढून जनजागृती करण्यात आली. शुक्रवारी जिल्हाभरात किती वृक्षांची लागवड झाली, हे कळू शकले नाही. परंतु १५ लाखापेक्षा अधिक वृक्ष लागवड होण्याची शक्यता आहे. (नगर प्रतिनिधी)