लोहाराचा हॉकीपटू आकाशला ‘रिओ आॅलिम्पिक’चे वेध
By Admin | Updated: April 23, 2016 02:34 IST2016-04-23T02:34:40+5:302016-04-23T02:34:40+5:30
मलेशियातील अजलान शाह चषक आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करीत रजत पदक मिळाले.

लोहाराचा हॉकीपटू आकाशला ‘रिओ आॅलिम्पिक’चे वेध
नीलेश भगत यवतमाळ
मलेशियातील अजलान शाह चषक आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करीत रजत पदक मिळाले. या कामगिरीमुळे माझा आत्मविश्वास दुणावला. आता लक्ष्य केवळ रिओ आॅलिम्पिक हेच आहे. आॅलिम्पिक स्पर्धेसाठी संभाव्य २५ भारतीय खेळाडूंमध्ये माझी निवड झाली असून अंतिम १६ मध्ये स्थान मिळविण्यासाठी कठोर परिश्रम घेणार आहे, असे मत भारतीय हॉकी संघाचा गोलरक्षक व यवतमाळ येथील रहिवासी आकाश चिकटे यांनी व्यक्त केले.
आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेतल्यानंतर यवतमाळात परतलेल्या आकाश चिकटे यांनी ‘लोकमत’शी मनमोकळा संवाद साधला. २०१५ मध्ये पुण्यातील वरिष्ठ गट राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत मी सर्वोत्कृष्ट गोलरक्षक ठरलो. त्यानंतर राष्ट्रीय शिबिरासाठी निवड झाली. त्यातून ३३ उत्कृष्ट हॉकीपटू निवडले गेले. त्यातूनच मलेशियातील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी व ‘रोड टू रिओ’ मोहिमेंतर्गत २५ खेळाडूंची निवड होणार होती. विशेष म्हणजे दोन्ही प्रकारात माझी निवड झाली.
मलेशियात अजलान शाह स्पर्धेत भाग घेणाऱ्या भारतीय संघात मी वयाने सर्वात लहान खेळाडू. ही पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा असल्याने थोडी धाकधूक होती. पहिल्या दोन्ही सामन्यात मला संधी मिळाली नाही. तिसरा सामना कॅनडाविरुद्ध होता. त्याच्या काही मिनिटांपूर्वी अचानकपणे कोच ओल्टमेन्स यांनी माझ्यावर गोलरक्षकाची जबाबदारी सोपविली. माझ्यासह सर्व संघच चकित झाला. या सामन्यात मी दोन पेनॉल्टी कॉर्नर व दोन मैदानी गोल अडविले. भारताने हा सामना ३ विरुद्ध १ गोलने जिंकला. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी स्टेडियम तुडूंब भरले होते. आम्ही आक्रमक सुरुवात केली. पाकिस्तानचा ५-१ ने धुव्वा उडविला. मैदानावर भारत-पाक खेळाडू कट्टर प्रतिस्पर्धी असले तरी मैदानाबाहेर त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध असतात, असे आकाश चिकटे म्हणाले.
आॅस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम फेरीचा रोमांच अविस्मरणीय असल्याचे आकाशने सांगितले. सामन्यापूर्वी आम्ही व्यूहरचना करीत होतो. अनेक व्हिडीओचे फुटेज पाहूनही आॅस्ट्रेलियन खेळाडूंचे विक पॉर्इंट भेटत नव्हते. आॅसी खेळाडू भारतीय खेळाडूंपेक्षा खूप वेगवान हालचाली करतात. त्यामुळे कोचने आक्रमक खेळाच्या सूचना दिल्या. पण आमची कामगिरी समाधानकारक होवू शकली नाही. तरीही रजत पदक मिळाल्याचा आनंद आहे. कर्णधार सरदारसिंग, एस.व्ही. सुनील, मनप्रितसिंग, तलविंदर, रूपिंदरपाल या सिनिअर खेळाडूंकडून खूप शिकायला मिळाले. कोच रोलेंट ओल्टमन्स यांचे सर्व खेळाडूंसोबत मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे आकाशने सांगितले.
आॅगस्ट महिन्यापासून रिओ येथे होणाऱ्या आॅलिम्पिक स्पर्धेसाठी आकाश जोरदार मेहनत घेत आहे. २३ एप्रिलपासून बंगलूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय सराव शिबिरात तो सहभागी होणार आहे. त्याच्या या भरारीने यवतमाळचा लौकिक वाढला आहे.