विठाळाच्या २०० घरांना कुलूप
By Admin | Updated: March 27, 2015 01:36 IST2015-03-27T01:36:22+5:302015-03-27T01:36:22+5:30
दुष्काळी परिस्थिती, शेतातील संपलेली कामे आणि रोजगार हमीच्या कामाबाबत उदासीनता यामुळे शेकडो मजूर कामाच्या शोधात शहराकडे धाव घेत आहे.

विठाळाच्या २०० घरांना कुलूप
प्रकाश सातघरे दिग्रस
दुष्काळी परिस्थिती, शेतातील संपलेली कामे आणि रोजगार हमीच्या कामाबाबत उदासीनता यामुळे शेकडो मजूर कामाच्या शोधात शहराकडे धाव घेत आहे. साडेतीन हजार लोकसंख्येच्या विठाळा गावातील १२०० पेक्षा जास्त मजूर स्थलांतरित झाले असून तब्बल २०० घरांना सध्या कुलूप लागले आहे. अशीच स्थिती तालुक्यातील इतरही गावांची आहे.
दिग्रस तालुक्यातील विठाळा या गावात सहज फेरफटका मारला तरी दोन घराआड एका घराला कुलूप लागलेले दिसून येते. विठाळा हे तीन हजार लोकसंख्येचे गाव. येथील ७० टक्के कुटुंब मजुरीवरच गुजराण करतात. यावर्षी निसर्गाच्या अवकृपेने मजुरांच्या हाताला कामच नाही. सुगीच्या हंगामातही शेतकऱ्यासोबत मजूरही रिकाम्या हाताने दिसत आहे. अशा परिस्थितीत जगायचे कसे असा प्रश्न मजुरांपुढे पडला. टीचभर पोटासाठी गावातील अनेक कुटुंब आता मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, सुरत आदी ठिकाणी पोटाची खळगी भरण्यासाठी धाव घेत आहे. गत दोन महिन्यात या गावातून १२०० च्यावर मजूर शहराकडे स्थलांतरित झाले आहे. मुंबई, पुण्यात ही मंडळी बांधकाम, हॉटेल, रंगाई आदी कामात गुंतलेली दिसतात. तर काही मंडळी शहरानजीकच्या परिसरात विटभट्टीवर काम करतात. अनेक जण सुरत येथील कंपनीमध्ये कामाला गेले आहे. परिणामी गावातील घरांना कुलूप लागलेले दिसून येते. उदास झालेले अंगण आणि घराला दिसणारे कुलूप पाहून गावाची रौणक हरविली आहे.
मजुरांचे स्थलांतरण रोखण्यासाठी रोजगार हमीची कामे शासनाच्यावतीने केली जातात. विठाळा येथे पांदण रस्ता, दोन विहिरी आणि सात शौचालयाचे बांधकाम रोहयोमधून प्रस्तावित आहे. परंतु मोठ्या प्रमाणात काम नसल्याने ही मंडळी शहराकडे धाव घेत आहे. आपल्या मुलाबाळासह शहरात वास्तव्याला आहे. त्यांना गावातच काम उपलब्ध करून दिल्यास त्यांचे स्थलांतरण थांबू शकते. परंतु कुणीही पुढाकार घेत नाही. अशीच अवस्था तालुक्यातील इतरही गावांची आहे. वस्ती, वाडे आणि तांड्यातून शेकडो मजूर बाहेरगावी जात आहे. त्यांना गावातच रोजगार मात्र उपलब्ध करून दिला जात नाही.