हलकं-फुलकं नाटक : ‘वा! वाट्टेल ते प्रेमासाठी’
By Admin | Updated: July 29, 2015 02:39 IST2015-07-29T02:37:12+5:302015-07-29T02:39:21+5:30
प्रेमासाठी वाट्टेल ते करण्याची प्रेमवीरांची तयारी हा तसा पुरातन विषय. साहित्याचा बहुतांश भाग प्रेम आणि प्रेमासाठी सर्व काही या विषयानेच व्यापलेला दिसतो.

हलकं-फुलकं नाटक : ‘वा! वाट्टेल ते प्रेमासाठी’
काशिनाथ लाहोरे यवतमाळ
प्रेमासाठी वाट्टेल ते करण्याची प्रेमवीरांची तयारी हा तसा पुरातन विषय. साहित्याचा बहुतांश भाग प्रेम आणि प्रेमासाठी सर्व काही या विषयानेच व्यापलेला दिसतो. कथा, कादंबऱ्या, नाटक, चित्रपटात प्रेमाशिवाय काहीच दिसत नाही. त्यातही प्रेमविवाह असेल तर प्रारंभीचे गुलाबी दिवस संपल्यावर भांडणाशिवाय संसारात काहीच शिल्लक राहात नाही. अॅड. नानासाहेब इनामदार हे नावापुरतेच वकील. प्रेमाशी प्रेमविवाह करून घरजावयासारखे निष्क्रिय गृहस्थ. बायकोच्या कह्यात पूर्णपणे गेलेले. नवऱ्यासारखा नालायक माणूस दुसरा नाही, अशी समजूत झालेली प्रेमा. त्याला सतत धारेवर धरते. फुलदानी फुटली तरी फोडून काढीन, अशी धमकी देते. यांचे एकुलते एक अपत्य म्हणजे आदित्य. मैत्रीण सोनालीशी प्रेम करण्याशिवाय याचाही दुसरा उद्योग नाही. फुकटात पेपर वाचून चहा उकळणारा आणि प्रेमाशी जवळीक साधू पाहणारा शेजारी बाटलीवाला. २० वर्षांपूर्वी घर सोडून निघून गेलेला नानासाहेबांचा भाऊ दादासाहेब. चित्रपटात नेहमीच हास्यविषय झालेली व्यक्ती म्हणजे पोलीस इन्स्पेक्टर. त्यांची मोलकरीण कमला. प्रेमाचा बालमित्र रमेश गोडबोले, दादासाहेबांची तथाकथित पत्नी रोझा आणि वेड्याच्या दवाखान्यातून पळालेला आणि स्वत:ला डॉक्टर म्हणविणारा मनोरुग्ण. अशी एकापेक्षा एक भन्नाट पात्र असलेले भन्नाट विनोदी नाटक म्हणजे ‘वा! वाट्टेल ते प्रेमासाठी’. फुलदानी फुटल्याचे निमित्त होते. बायकोपासून वाचण्यासाठी नानासाहेब मुलाच्या सल्ल्याने घर सोडून निघून जातात. २० वर्षांपूर्वी घर सोडून गेलेल्या दादासाहेबांच्या रुपात पुन्हा घरी येतात. आणि नंतरचा गोंधळ म्हणजे हे नाटक. नवऱ्यची खोड मोडण्यासाठी बायको प्रेमाने रचलेले नाटक त्यावर कडी करणारे ठरते. शेवटी गैरसमज दूर होऊन पुन्हा एकमेकांना भांडायला मोकळे असे अत्यंत ठिसूळ कथानक असलेले हे नाटक आहे.
तीन अनुभवी कलावंत वगळले तर बाकीचे सर्व कलावंत नवीन असल्याचे वारंवार जाणवत होते. सदोष ध्वनिव्यवस्था, कमकुवत प्रकाश योजना आणि संगीत, यथातथाच नेपथ्य इत्यादी कारणांमुळे ज्या उंचीवर नाटक जायला हवे होते, ती उंची त्याला गाठता आली नाही. त्यात भर पडली ती घामाच्या धारांची, नाट्यगृहाच्या दुरुस्तीची आणि ऐनवेळी बदललेल्या पात्राची.
विकास विसपुते लिखित, अपूर्वा सोनार निर्मित आणि दिग्दर्शित या दोन अंकी नाटकात प्रा. अजय कोलारकर, अविनाश मानेकर, मेघा भास्करवार, स्नेहा पारोदे, ऋषिकेश व्यास, स्वप्नील घोडे, पूजा खंडारे, श्रद्धा कोलारकर, अनिकेत मुडे अपूर्वा सोनार यांनी भूमिका साकारल्या आहेत. प्रकाशयोजना अशोक कार्लेकर यांची तर पवन भारस्कर यांनी संगीत दिले आहे.
शनिवारी २५ जुलैला स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा श्रोतृगृहात पार पडलेल्या या नाटकासाठी रसिकवर्ग मात्र मोठ्या संख्येने हजर होता. तेजांकूर संस्था व जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने एका निराधार महिलेच्या मदतीकरिता हा नाट्यप्रयोग झाला.