आयुष्याच्या राखेतून शोधले जाते जीवन-मरणाचे नाते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2020 05:00 IST2020-11-17T05:00:00+5:302020-11-17T05:00:16+5:30
माणूस कसा जगतो आणि तो कुठल्या परिस्थितीमध्ये जगतो, याची जगामध्ये अनेक उदाहरणे आहेत. परंतु अण्णाभाऊ साठे यांच्या स्मशानातील सोनं या पाठाचा परिचय देत असताना, कुणाची उपजीविका कशावरती राहील हे काही सांगता येत नाही. प्रेताला जाळत असताना प्राचीन काळामध्ये तोंडामध्ये सोन्याचा मणी किंवा अंगावरती सोन्याच्या दागिन्यांचा तुकडा हेच स्मशानामध्ये वास्तव्य करणाऱ्या मसणजोगी समाजाचं उपजीविकेचे साधन होतं.

आयुष्याच्या राखेतून शोधले जाते जीवन-मरणाचे नाते
किशोर वंजारी
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : "यहापे सब शांती शांती है" या उक्तीप्रमाणे जीवन-मरणाचा मार्ग अक्षरशः प्रेताच्या राखेतून शोधण्याचा प्रकार मानवाच्या संवेदना जाग्या करणारा आहे. मृत्यू हे अंतिम सत्य आहे, हे जेव्हा माणसाला गवसलं तेव्हा त्याने आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल केलेत. जगण्याचे संदर्भ बदलले.
माणूस कसा जगतो आणि तो कुठल्या परिस्थितीमध्ये जगतो, याची जगामध्ये अनेक उदाहरणे आहेत. परंतु अण्णाभाऊ साठे यांच्या स्मशानातील सोनं या पाठाचा परिचय देत असताना, कुणाची उपजीविका कशावरती राहील हे काही सांगता येत नाही. प्रेताला जाळत असताना प्राचीन काळामध्ये तोंडामध्ये सोन्याचा मणी किंवा अंगावरती सोन्याच्या दागिन्यांचा तुकडा हेच स्मशानामध्ये वास्तव्य करणाऱ्या मसणजोगी समाजाचं उपजीविकेचे साधन होतं.
समाज बदलला संदर्भ बदलले आणि माणसं बदलली. प्रेताच्या सोबत आता कमरेला असणारा करदोडासुद्धा दिला जात नाहीत. त्याला कंबरपट्टा म्हटलं जातं. त्यामुळे स्मशानात आलेल्या प्रेतासोबत असते ती फक्त जळल्यानंतरची राख. आज स्मशानातील प्रेताची विल्हेवाट करीत असताना फुटी कवडीही दिसत नाही. एकीकडे प्रचंड अठराविश्व दारिद्र्य तर दुसरीकडे माणसांच्या जीवनामध्ये बदलते संदर्भ या कुटुंबाचा उदरनिर्वाह बदलून गेले. आयुष्य समर्पित करण्यासाठी केलेली मदत आमच्यासाठी लाख मोलाची आहे. नेर येथील पवन जयस्वाल यांनी आम्हाला मायेचा हात दिला आहे. आम्हास आज मदतीची गरज असल्याचे रामाराव एलाप्पा घनसरवार म्हणाले. स्मशानभुमीतील व्यवस्थापन त्यांच्याकडे सोपविले. तेथे त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली. या कुटुंबाने माणुसकीचं नातं संपूर्ण शहरांशी जोडलेलं आहे, असे मत नगरपरिषदेचे उपाध्यक्ष पवन जयस्वाल यांनी मांडले. हा समाज विकासाच्या प्रवाहात यावा, यासाठी शासनाकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
स्मशानभूमीत राहून करतात गुजरान
आज प्रत्येकाचा व्यवसाय ठरलेला आहे. परंतु एक अशी जमात आहे, कि ज्यांना कुठलेही भय नाही. स्मशान जोगी समाजातील असाच एक परिवार भटकत नेर स्मशानभूमीत पोहोचला आहे. रामाराव एल्लाप्पा घनसरवार व त्यांच्या कुटुंबातील चांदु रामाराव घनसरवार, दुर्गा चांदु घनसरवार, आशा चांदु घनसरवार हा परिवार नेर स्मशानभूमीमध्ये राहून आपल्या परिवाराची गुजराण करीत आहे. मसणजोगी समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन जरी वेगळा असला तरी आम्हीही माणसेच आहोत, आणि स्मशानामध्ये आलेली मृत व्यक्ती ही आमचेसाठी देवरूपी आत्मा असल्याची प्रतिक्रिया रामाराव एलाप्पा घनसरवार यांनी नोंदविली.