आमदारांची पाठ, खासदारांची मदत
By Admin | Updated: June 20, 2016 02:20 IST2016-06-20T02:20:12+5:302016-06-20T02:20:12+5:30
तालुक्यातील राजकीयदृष्ट्या जागरुक चातारी येथे गत १० वर्षांपासून भीषण पाणीटंचाई असून नळ योजनाही बंद आहे.

आमदारांची पाठ, खासदारांची मदत
पाणीटंचाई : चातारीच्या नागरिकांना दिलासा
ढाणकी : तालुक्यातील राजकीयदृष्ट्या जागरुक चातारी येथे गत १० वर्षांपासून भीषण पाणीटंचाई असून नळ योजनाही बंद आहे. या गावाला भाजपा आमदार राजेंद्र नजरधने यांनी दत्तक घेतले. परंतु त्यांनी या गावाकडे पाठ फिरविली. परिणामी गावातील समस्या कायमच होती. अलिकडेच काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांनी या गावाला भेट दिली आणि जलसंकट दूर करण्याचे मान्य केले.
उमरखेड तालुक्यातील चातारी येथे भीषण पाणी समस्या आहे. उन्हाळाभर नागरिकांना त्रास सहन करावा लागला. सरपंच व सदस्य पाणी समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न आहे. अशातच आमदार नजरधने यांनी चातारी गाव दत्तक घेतले आता पाण्याची समस्या मिटेल अशी आशा गावकऱ्यांना होती. परंतु आमदारांनी समस्या सोडविणे तर दूर साधी भेटही दिली नाही. मात्र खासदार राजीव सातव यांनी जलसंधारणाच्या कामाला मदत करून पुढाकार घेतला. त्यांच्या मदतीमुळे चातारीवासीयांचे जलसंकट दूर होणार हे निश्चित.
जलसंधारण कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा कृषी अधिकारी डी.ए. गायकवाड यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी राम देवसरकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रमेश चव्हाण, दत्ता शिंदे, रमेश पिंपरखेडे, पोलीस पाटील शिवाजी माने, शामराव माने उपस्थित होते. यशस्वीतेसाठी सरपंच भगवान माने, विलास माने, जांबुवंत माने, गजानन माने, गजानन गोविंदवार, पप्पू माने, बंडू हामंद, शाम धात्रक, वासुदेव माने, साहेबराव धात्रक उपस्थित होते. (वार्ताहर)