सबलीकरण मेळाव्याला पाठ
By Admin | Updated: August 22, 2014 00:09 IST2014-08-22T00:09:38+5:302014-08-22T00:09:38+5:30
येथील पंचायत समिती सभागृहात राजीव गांधी सशक्तीकरण अभियानातर्गंत ‘पंचायत सबलीकरण मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. मेळाव्यात तालुक्यातील सरपंच व सचिवांना मार्गदर्शन

सबलीकरण मेळाव्याला पाठ
सरपंच व सचिवांना मार्गदर्शन : पदाधिकाऱ्यांच्या सशक्तीकरणावर जोर
कळंब : येथील पंचायत समिती सभागृहात राजीव गांधी सशक्तीकरण अभियानातर्गंत ‘पंचायत सबलीकरण मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. मेळाव्यात तालुक्यातील सरपंच व सचिवांना मार्गदर्शन करण्यात आले. परंतु या मेळाव्याला पदाधिकाऱ्यांनीच पाठ दाखविल्याने उपस्थितांमध्ये विविध चर्चांना उधाण आले होते.
ग्रामपंचायत स्तरावरील पदाधिकाऱ्यांचे सशक्तीकरण करणे हा मेळावा घेण्यामागील मुख्य उद्देश होता. परंतु ग्रामपंचायत स्तरावरील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती हीसुद्धा फारसी नव्हती.
सेवानिवृत्त विस्तार अधिकारी (पंचायत) श्रीराम बाहेकर, गटविकास अधिकारी मनोहर नाल्हे, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रकाश नाटकर, विस्तार अधिकारी अशोक ठाकरे, रमेश केळकर ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष राजेश साव यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
पर्यावरण संतुलीत ग्रामसमृध्दी योजना, ग्रामपंचायत प्रशासनाचा कारभार, कर वसुली वाढविणे, पाणीपुरवठा व पाणी शुध्दीकरण, यशवंत पंचायतराज योजना, निर्मल भारत योजना, राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम, अंदाजपत्रकातील निधी मागासवर्गीयांच्या विकासासाठी खर्च करणे आदी विषयांची माहिती सरपंच व सचिवांना देण्यात आली. या योजनांचा ग्रामीण भागात अतिशय उपयोग होणार आहे. योग्यरित्या या योजनांची अंमलबजावणी झाल्यास ग्रामीण भाग सुजलाम् सुफलाम् झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळेच सदर योजनांसदंर्भात सर्व बारिक-सारिक माहिती पदाधिकाऱ्यांना असणे आवश्यक आहे. या मेळाव्यात तज्ज्ञांनी अतिशय मुद्देसूद माहिती याविषयावर उपस्थित लोकप्रतिनिधी व कर्मचाऱ्यांना दिली. म्हणूनच या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
परंतु या मेळाव्याला बहुतांश पदाधिकारीच उपस्थित नसल्यामुळे ग्रामिण भागातील योजनांसंदर्भात हे पदाधिकारी किती गंभीर आहे, हेच यातून दिसून आले. मेळाव्यासाठी तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना निमंत्रित करण्यात आले होते. कळंब तालुक्यात तीन जिल्हा परिषद व सहा पंचायत समिती सदस्य आहे. परंतु पंचायत समिती सदस्य तिलोत्तमा मडावी सोडल्या तर इतर सर्व सदस्यांनी पंचायत सबलीकरण मेळाव्याकडे पाठ फिरविली. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख हे सुध्दा याच तालुक्याचे प्रतिनिधीत्व करतात. तरीसुद्धा ते किंवा त्यांचा कुणीही प्रतिनिधी या मेळाव्याला उपस्थित नव्हते. (तालुका प्रतिनिधी)