विधानसभेचे बिग बजेट
By Admin | Updated: October 8, 2014 23:31 IST2014-10-08T23:31:57+5:302014-10-08T23:31:57+5:30
काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना हे सर्वच प्रमुख पक्ष स्वबळावर विधानसभा लढवित असल्याने पहिल्यांदाच ही निवडणूक बिग बजेट झाली आहे. या निवडणुकीत राजकारणासह विविध

विधानसभेचे बिग बजेट
सर्व काही पैसाच : समस्या बाद, कुणालाच सोयरसूतक नाही
यवतमाळ : काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना हे सर्वच प्रमुख पक्ष स्वबळावर विधानसभा लढवित असल्याने पहिल्यांदाच ही निवडणूक बिग बजेट झाली आहे. या निवडणुकीत राजकारणासह विविध क्षेत्रातील ब्लॅक मनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष व्हाईट होणार आहे.
निवडणुकीच्या रिंगणातील सर्वच प्रमुख उमेदवार ‘गब्बर’ असल्याची जाणीव मतदारांना आहे. त्यांनी नामांकनाच्या शपथपत्रात दाखविलेल्या मालमत्तेपेक्षा प्रत्यक्षात किती तरी पट अधिक मालमत्ता अनेक उमेदवारांकडे असेल याची खात्री मतदारांना आहे. ही निवडणूक म्हणजे यंदाची दिवाळी अशी मानसिकता आता मतदारांची झाली आहे. म्हणूनच त्यांनी ही निवडणूक ‘कॅश’ करण्यासाठी कोणतीही संधी सोडायची नाही, असा चंगच जणू बांधल्याचे दिसून येते. पूर्वी निष्ठावंत कार्यकर्त्यांचा भरणा होता. मात्र आता या निष्ठेचा प्रचंड अभाव पहायला मिळत आहे. निवडणुकीत सर्व काही ‘कमर्शियल’ झाले आहे. पैशाशिवाय काहीच नाही हे वास्तव आहे. याची जाणीव उमेदवाराप्रमाणेच कार्यकर्त्यांनाही आहे. पूर्वी गावात उमेदवार आल्यानंतर विकास, समस्या याबाबत जाब विचारला जायचा. परंतु आता हे मुद्दे बाजूला पडले आहेत. त्याची जागा पैशांनी घेतली आहे. विकास व समस्यांचा पाढा वाचल्यास उमेदवार केवळ आश्वासन देतो, मत घेतो आणि पुन्हा पाच वर्ष तोंड दाखवित नाही. त्यात उमेदवाराला ‘कॅश’ करता येत नसल्याने नुकसान आपलेच होते, याची जाणीव मतदाराला झाली आहे. त्यामुळे पैसा हा मतदारांचा बेस झाला आहे. आपले मत विकू नका याबाबत प्रशासन व सामाजिक संस्थांकडून जनजागृती केली जाते. मात्र त्याचा काही एक फरक मतदारांवर पडताना दिसत नाही. पैसा हाच मार्ग असल्याने उमेदवारही थेट मतदारांकडे जाण्याऐवजी गठ्ठा मतांच्या एजंटांमार्फत जाणे पसंत करतो. अनेक ठिकाणी अर्धवट मंदिराचे बांधकाम, साहित्य पुरवठा, क्रीडा साहित्य, भजनी साहित्य अशा सामूहिक हिताच्या वस्तूंची मागणी केली जाते. त्याची तत्काळ अंमलबजावणीही उमेदवाराकडून होते. मात्र बहुतांश वेळा संधी वैयक्तिक स्तरावर कॅश करणे एवढाच उद्देश असतो. याचा प्रत्यय ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात येतो आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा एक उमेदवार पैसे देतानाच वसुलीची भाषा आक्रमकपणे वापरत असल्याने या उमेदवाराचे पैसे घेण्यासही अनेक जण धजावत नसल्याचे सांगितले जाते. याच उमेदवाराच्या एका निष्ठावंत पदाधिकाऱ्याने मंदिर बांधकामासाठी निधी मागून नंतर दुसऱ्याचाच निधी स्वीकारणाऱ्या एका गावपुढाऱ्याच्या कानशिलात हाणल्याचा प्रकारही पुढे आला.
पैशासाठी एका पेक्षा अनेक पर्याय उपलब्ध असल्याने मतांची एजंटांमार्फत जणू बोली लावली जात आहे. मनी बेस निवडणुकांमुळे सर्वच उमेदवारांचे बजेट वाढले. ही निवडणूक विविध अर्थांनी बिग बजेट झाली आहे. निवडणुकीतील खरी आर्थिक उलाढाल पुढील आठवड्यात पहायला मिळण्याची शक्यता आहे. दारू, पार्ट्या याचा तर जणू महापूर सर्वत्र आला आहे. निवडणूक काळात परवाना प्राप्त देशी-विदेशी दारूच्या झालेल्या विक्रीतून उमेदवारांच्या पार्ट्यांवरील खर्चाचा सहज अंदाज येतो. निवडणुकीमुळे गोरगरिबांची दिवाळी १५ दिवस आधीच साजरी होत आहे, एवढे मात्र निश्चित.
उमेदवारच निष्ठावंत नाहीत तर कार्यकर्ते आणि मतदारांकडून अपेक्षा कशी करता असा प्रश्नसुद्धा उपस्थित केला जात आहे. अंगावरील कपड्याप्रमाणे पक्ष बदलविणाऱ्या उमेदवारांना मतदारही चांगले ओळखून आहेत. त्यांच्याकडील काळा पैसा बाजारात आणणे हा प्रामाणिक हेतू असल्याची प्रतिक्रियाही ग्रामीण भागातील काही मतदारांनी ‘लोकमत’कडे नोंदविली. (जिल्हा प्रतिनिधी )