वाघाडी प्रकल्पाचे पाणी सोडा
By Admin | Updated: July 16, 2015 02:39 IST2015-07-16T02:39:43+5:302015-07-16T02:39:43+5:30
पावसाची चांगली सुरुवात झाल्याने लगबगीने पेरणी झाली. पिकांची उगवणही बऱ्यापैकी झाली.

वाघाडी प्रकल्पाचे पाणी सोडा
सुरेश लोणकर : २४ दिवसांपासून पाऊस नाही
घाटंजी : पावसाची चांगली सुरुवात झाल्याने लगबगीने पेरणी झाली. पिकांची उगवणही बऱ्यापैकी झाली. मात्र, हातात आलेल्या पिकाला दडी मारलेल्या पावसाने चांगलीच हुलकावणी दिल्याने दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यातून शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी घाटंजी तालुक्याच्या कार्यक्षेत्रातील वाघाडी प्रकल्पाचे पाणी कालव्याद्वारे सोडावे, अशी मागणी सुरेश लोणकर यांनी केली आहे.
घाटंजी तालुक्यात गेल्या २४ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. शेतात उगवलेले पीक कोमेजून माना खाली टाकल्या आहे. तर काही शेतातील बिज जमिनीवर गुदमरत आहे. त्यामुळे घाटंजी तालुका दुष्काळाच्या छायेत दिसत आहे. या पिकांना वाचविण्यासाठी जलसंपदा विभागाने पुढाकार घेतल्याचे समजले. मात्र, त्यांचा अध्यादेश निघेपर्यंत बहुतांश शेतातील पीक नेस्तनाबूत होईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
त्यामुळे संबंधितांनी विलंब न करता वाघाडी प्रकल्पाचे पाणी सोडून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. वाघाडी प्रकल्पात आजमितीला ५१ टक्के पाणीसाठा असल्याचे अनुमान आहे. त्यामुळे या प्रकल्पातील पाणी शेतकऱ्यांना देण्यास काहीही अडचण निर्माण होणार नसल्याचा अंदाज लोणकर यांनी वर्तविला आहे. कोरडवाहू शेतातील पीक शेवटच्या घटका मोजत आहेत. ही कोरडवाहू शेती बहुतांश प्रमाणात वाघाडी प्रकल्प लाभक्षेत्रात येते. प्रकल्पाचे पाणी सोडविण्याची मागणी लोणकर यांनी केली. (प्रतिनिधी)