कायदा व सुव्यवस्थेवरील चर्चा : एसडीपीओ कार्यालयाचा परिसर
By Admin | Updated: July 15, 2015 02:56 IST2015-07-15T02:56:24+5:302015-07-15T02:56:24+5:30
स्थानिक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर अप्सरा चौकात चालणारा जुगार अड्डा चक्क मुंबईत गाजला.

कायदा व सुव्यवस्थेवरील चर्चा : एसडीपीओ कार्यालयाचा परिसर
अप्सरा चौकातील जुगार मुंबईत गाजला
यवतमाळ : स्थानिक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर अप्सरा चौकात चालणारा जुगार अड्डा चक्क मुंबईत गाजला. त्यानंतर सारवासारव करीत रविवारी रात्री या अड्ड्यावर धाड घालून पाच जणांना अटक करण्यात आली.
राज्याचे भाजपातील ज्येष्ठ नेते तथा सार्वजनिक बांधकाम, सहकार मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडल्याचे विधान केले होते. खुद्द सरकारमधील एका मंत्र्यानेच मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या गृहखात्याच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह उभे केले गेल्याने त्यांचे हे विधान सर्वच स्तरावर गांभीर्याने घेतले गेले होते. त्या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीने गुरुवार ९ जुलै रोजी रात्री ९ ते १० या वेळात ‘राज्यातील कायदा व सुव्यवस्था’ या विषयावर चर्चा आयोजित केली होती. या चर्चेत भाजपाचे प्रवक्ते सुहास फरांदे, माजी आयपीएस अधिकारी सुधाकर सुरडकर, काँग्रेसचे राज्य चिटणीस अभिजित देशमुख सहभागी झाले होते. जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी फोनवरून या चर्चेत सहभाग घेतला. या चर्चेमध्ये विदर्भातील अनेक महत्वाचे मुद्दे गाजले. त्यात यवतमाळच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयापासून ५० मीटर अंतरावर जुगार अड्डा चालत असल्याचे उदाहरण दिले गेले. कार्यालयाच्या उजवीकडे अप्सरा टॉकीज चौकात तर डावीकडे कॉटन मार्केट चौकात अगदी रोड टच हा जुगार अड्डा चालविला जातो. थेट चॅनलवर अप्सरा टॉकीज चौकातील जुगार अड्ड्याची चर्चा झाल्याने स्थानिक पोलीस दलात खळबळ निर्माण झाली. मात्र लगेच धाड घातल्यास चर्चेतील बाब सिद्ध होईल, म्हणून पोलिसांनी काहीसे शांत राहत रविवारी रात्री १० वाजता अप्सरा चौकातील जुगारावर घाड घातली. या धाडीत दहा हजार रुपये रोख जप्त करण्यात आले असून किरीट गढिया (५५) रा.पेशवे प्लॉट, अनिल कुमरे (२५) रा.अंबानगर, प्रवीण तुभाते (३५), सचिन तुभाते दोघेही रा.माळम्हसोला, आसिफ अली मोहम्मद अली रा. शारदा चौक या पाच जणांना अटक केली गेली. या प्रकरणात नियमानुसार जुगार अड्ड्याच्या मालकावर कारवाई होणे अपेक्षित होते.
मात्र पोलिसांनी केवळ खानापुर्ती केल्याचे दिसून येते. अप्सरा चौकातील जुगार थेट वृत्त वाहिनीवर गाजला म्हणून ही धाडीची कार्यवाही केली गेली. प्रत्यक्षात यवतमाळ शहरात व जिल्ह्यात ठिकठिकाणी जुगार, मटका अड्डे सुरू आहेत. मात्र त्या विरोधात पोलिसांनी अद्याप ठोस भूमिका घेतल्याचे ऐकिवात नाही. कदाचित धाडींसाठी हे जुगार, मटका अड्डेही वृत्त वाहिनीवर झळकण्याची प्रतीक्षा पोलिसांना नसावी ना, अशी शंका व्यक्त होत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी अनेक क्राईम मिटींगमध्ये अवैध धंदे चालणार नाही, असा दम ठाणेदार व एसडीपीओंना दिला होता. प्रत्येक मिटींगमध्ये एसपींकडून त्याचा पुनरुच्चार केला जातो. मात्र त्यानंतरही सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दारू, जुगार, मटका राजरोसपणे सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते.
थेट एसपींचेही न ऐकणारे जिल्ह्यातील ठाणेदार किती मगरूर असावे याचा अंदाज येतो. अनेक ठाण्यांच्या हद्दीत एलसीबी पथकाने धाडी यशस्वी केल्या. त्यानंतर एसपींकडून कारवाईची भूमिका घेतली न गेल्याने कदाचित या ठाणेदारांची हिंमत वाढली असावी व म्हणूनच ते एसपींची तंबी तेवढे गांभीर्याने घेत नसावे, असा सूर पोलीस वर्तुळातून ऐकायला मिळतो आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
प्रभारी पोलीस महानिरीक्षकांची चर्चा
बिपीन बिहारी यांची अपर पोलीस महासंचालक पदी मुंबईत बढती झाल्यापासून अमरावतीच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांचे पद रिक्त आहे. रिक्त पदाचा अतिरिक्त प्रभार शेजारील समकक्ष अधिकाऱ्याला देण्याची प्रथा आहे. मात्र ही प्रथा मोडीत काढत अमरावतीचा प्रभार थेट ५०० किमीवरील पुण्याच्या अधिकाऱ्याला आणि तोही मोटर परिवहन विभागाच्या महानिरीक्षकाला दिला गेल्याने या चर्चेत आश्चर्य व्यक्त केले गेले होते.
वृत्त वाहिनीवरील या चर्चेत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या व बढत्यांमध्ये महासंचालक कार्यालयाकडून कसा घोळ घातला जातो, याची उदाहरणे दिली गेली. अकोला जिल्ह्याच्या हिवरखेड येथील पोलीस अधिकाऱ्याचे दीड महिन्यांपूर्वी निधन झाले. मात्र त्यानंतरही त्याचे नाव बदलीच्या यादीत कायम राहिले. वाशिम येथील एका पोलीस अधिकाऱ्याला महिनाभरापूर्वीच उपअधीक्षकपदी बढती दिली गेली. मात्र त्याचे नाव नंतर निघालेल्या पोलीस निरीक्षकांच्या बदली यादीत कायम होते.