लोहारा पाणीपुरवठा योजना अंतिम टप्प्यात
By Admin | Updated: February 11, 2016 02:46 IST2016-02-11T02:46:22+5:302016-02-11T02:46:22+5:30
लोहारा पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या योजनेंतर्गत सुयोगनगरात उभारलेल्या पाण्याच्या टाकीची चाचणीही यशस्वी झाली आहे.

लोहारा पाणीपुरवठा योजना अंतिम टप्प्यात
प्राधिकरणाचा दावा : सुयोगनगरातील टाकीची चाचणीही झाली
यवतमाळ : लोहारा पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या योजनेंतर्गत सुयोगनगरात उभारलेल्या पाण्याच्या टाकीची चाचणीही यशस्वी झाली आहे. या टाकीवरून मार्च अखेरपर्यंत पाणीपुरवठा केला जाईल, असा दावा महाराष्ट्र जीवन प्राधिरणाने केला आहे.
लोहारा ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांना पाणीपुरवठ्यासाठी ही योजना हाती घेण्यात आली. सुमारे ११ कोटी रुपयांच्या या योजनेसाठी पाण्याची टाकी उभारण्यासाठी जागेची अडचण होती. मात्र विशेष बाब म्हणून दोन ले-आऊटमधील खुल्या जागा (ओपन स्पेस) यासाठी उपलब्ध करून घेण्यात आल्या. दारव्हा मार्गावरील सुयोगनगर आणि वाघापूर-लोहारा बायपास मार्गावर असलेल्या वैभवनगर येथे स्थळ निश्चित करण्यात आले.
दोन्ही टाकीवरून सुमारे ४० किलोमीटर पाईपलाईन टाकली जाणार आहे. यातील काही काम पूर्ण झाले आहे. ज्या ठिकाणी ही कामे झाली, तेथील नागरिकांना पाणीपुरवठा केला जाणार आहे. उर्वरित भागात टप्प्याटप्प्याने कामे केली जाणार आहे. सुयोगनगरातील पाण्याची टाकी बांधून पूर्ण झाली आहे. शिवाय या टाकीवरून पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक त्या पाईपलाईन टाकण्यात आलेल्या आहेत. केवळ नागरिकांना जोडणी देण्याचे सोपस्कार आता पूर्ण करावे लागणार आहे.
वैभवनगरातील पाण्याच्या टाकीचे काम अर्धेअधिक झालेले आहे. या टाकीवरून पाणी सोडण्यासाठी काही भागात पाईपलाईन टाकण्यात आलेल्या आहे. शिवाय मुख्य पाईपलाईनचे काम जवळपास पूर्ण झालेले आहे. काही महिन्यातच या टाकीचीही चाचणी केली जाणार आहे. सदर दोन्ही पाण्याच्या टाकीवरून सुमारे पाच हजार नळजोडण्या दिल्या जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपविभागीय अभियंता शेषराव दारव्हेकर यांनी दिली. (वार्ताहर)