तलाठ्यांचे कचेरीसमोर धरणे
By Admin | Updated: April 21, 2016 02:51 IST2016-04-21T02:49:59+5:302016-04-21T02:51:09+5:30
विविध मागण्यांसाठी तलाठ्यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले. मागण्या मान्य न झाल्यास बेमुुदत संपाचा इशारा यावेळी देण्यात आला.

तलाठ्यांचे कचेरीसमोर धरणे
बेमुदत संपाचा इशारा : संगणकीकृत कामांवर आजपासून बहिष्कार, प्रशासनाला निवेदन सादर
यवतमाळ : विविध मागण्यांसाठी तलाठ्यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले. मागण्या मान्य न झाल्यास बेमुुदत संपाचा इशारा यावेळी देण्यात आला. आंदोलनात जिल्ह्यातील तलाठी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शासनाच्या धोरणावर तीव्र रोष व्यक्त करीत त्यांनी गुरुवारपासून संगणकीकृत कामांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा यावेळी केली. महाराष्ट्र राज्य तलाठी-पटवारी-मंडळाधिकारी समन्वय महासंघाच्या नेतृत्वात धरणे देऊन विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले.
तलाठी साजा आणि महसूल मंडळाची पुनर्रचना करावी, सातबारा संगणकीकरण आणि ई-फेरफारातील अडचणी दूर कराव्या, तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांना पायाभूत प्रशिक्षण देण्यात यावे, अवैध गौण खनिज वसुलीच्या कामातून तलाठ्यांना वगळण्यात यावे, तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालय बांधून देण्यात यावे, महसूल खात्यात पदोन्नतीसाठी द्विस्तरीय पध्दतीचा अवलंब करण्यात यावा, सरळ सेवेची २५ टक्के पद खात्यांतर्गत कर्मचाऱ्यांसाठी राखून ठेवण्यात यावी यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी धरणे देण्यात आले. या मागण्यांची पूर्तता न झाल्यास २१ एप्रिलपासून संगणकीकृत कामावर बहिष्कार, तर २६ एप्रिलपासून बेमुदत कामबंद आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा संघटनेच्यावतीने देण्यात आला.
यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण गाढवे, सचिव राजू मानकर, जिल्हा उपाध्यक्ष एन.एम. वाढोणकर, सहसचिव कामराज चौधरी, मंडळ अधिकारी संघटनेचे सचिव डी.पी. बदकी, उपाध्यक्ष सानप यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, मंडळ अधिकारी आणि तलाठी उपस्थित होते. (शहर वार्ताहर)
महसूल कर्मचाऱ्यांचे आंदोलन
यवतमाळ : प्रलंबित विविध प्रश्न निकाली काढण्यात यावे, या मागणीसाठी बुधवारी महसूल कर्मचाऱ्यांनी जिल्हा कचेरीसमोर धरणे दिले. महसूल कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनात कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संघटनेने पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनाचा हा एक भाग होता. महसूल विभागाच्या सर्व कार्यालयांमध्ये शुकशुकाट होता. कर्मचाऱ्यांची रिक्त पदे त्वरित भरण्यात यावी, तहसीलदारांचा ग्रेड-पे वाढविण्यात यावा, महसूल लिपीकांचे पदनाम बदलून महसूल सहाय्यक करण्यात यावे, वाहन चालकांना विशेष भत्ता देण्यात यावा, कोतवालांना वर्ग चारचा दर्जा देण्यात यावा, सेवानिवृत्त चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याच्या मुलास विशेष बाब म्हणून नोकरीत सामावून घेण्यात यावे, लोकसेवा आयोगाच्या पदामध्ये महसूलास पाच टक्के आरक्षण देण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी धरणे देण्यात आले. यामध्ये संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन टाके, सरचिटणिस नंदकुमार बुटे, कार्याध्यक्ष राजू मोटेमवार, सुधाकर राठोड, आशिष जयसिंगपुरे, प्रदीप राठोड, विजय कदम, श्याम मॅडमवार आदी सहभागी झाले होते. (शहर वार्ताहर)