पुरस्कार रकमेपासून वाचनालये वंचित

By Admin | Updated: August 17, 2015 02:37 IST2015-08-17T02:37:45+5:302015-08-17T02:37:45+5:30

तंटामुक्त गावातील मुलांना वाचनाची सवय लागावी, त्यांना नवनवीन माहितीची पुस्तके उपलब्ध व्हावी, यासाठी पुरस्कार रकमेतील पाच हजार रूपयांचे उपयुक्त ...

Lack of libraries from award money | पुरस्कार रकमेपासून वाचनालये वंचित

पुरस्कार रकमेपासून वाचनालये वंचित


मारेगाव : तंटामुक्त गावातील मुलांना वाचनाची सवय लागावी, त्यांना नवनवीन माहितीची पुस्तके उपलब्ध व्हावी, यासाठी पुरस्कार रकमेतील पाच हजार रूपयांचे उपयुक्त संदर्भ ग्रंथ, पुस्तके गावातील, शाळेतील वाचनालयांना खरेदी करून द्यावे, अशा शासनाच्या स्पष्ट सूचना (परिपत्रकीय) आहे. तथापि या परिपत्रकाचे कुणीच गांभीर्य लक्षात घेतले नसल्याचे दिसते. त्यामुळे पुरस्कार प्राप्त अनेक ग्रामपंचायतींनी या निर्देशांचे पालन केलेच नाही, हे वास्तव आहे.
महात्मा गांधी तंटामुक्त मोहिमेंतर्गत सन २००७ पासून राज्य शासनाने लोकसंख्येच्या आधारावर तंटामुक्त गावांना लाखो रूपयांच्या पुरस्काराचे वाटप केले आहे. दरवर्षी हे पुरस्कार वाटप सुरूच आहे. या पुरस्कार रकमेचा विनियोग गाव विकासासाठी कसा करावा, यासाठी मार्गदर्शक सूचनासुद्धा शासनाने दिल्या आहेत. ज्या गावांना लाखोंचा पुरस्कार मिळाला, त्यांनी या रकमेचा विनियोग कसा केला, हे मात्र कोडच आहे. त्यामुळे पुरस्कार रकमेचे फलित होते की नाही, हा संशोधनाचाच विषय ठरू शकतो.
परिश्रमपूर्वक गाव तंटामुक्त करून पुरस्कार मिळविणाऱ्या तंटामुक्त गाव समितीमार्फतच या रकमेचा विनियोग होणे गरजेचे आहे. तथापि तंटामुक्त गाव पुरस्काराची रक्कम ग्रामपंचायतीला मिळत असल्याने गावपुढारी व ग्रामपंचायत पदाधिकारी तंटामुक्त समितीला विश्वासात न घेताच त्याची विल्हेवाट लावतात, असा अनुभव आहे. परिणामी पुरस्कार प्राप्त तंटामुक्त समित्यांचे महत्वच नाहीसे झाले आहे. शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे पुरस्कार निधीच्या दोन टक्के रक्कम पुरस्कार समारंभासाठी, १५ टक्के रक्कम तंटामुक्त गाव मोहिमेच्या प्रचार व प्रसिद्धीसाठी, पाच टक्के रक्कम प्रशासकीय व कार्यालयीन बाबीसाठी खर्च करावयाची आहे. तसेच पुरस्कार रकमेच्या १५ टक्के रक्कम ग्रामपंचायतीत रहिवासी असलेल्या विद्यार्थी, युवक, तंटामुक्तीसाठी परिश्रम घेणारे ग्रामस्थ, व्यसनमुक्त नागरिक, गावातील दहावीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी दारिद्र्यरेषेखालील उत्तीर्ण विद्यार्थी, अंमलबजावणी वर्षातील मुलींना जन्म देणाऱ्या मातांना जन्मानंद व माहेर भेट, गावातील महिला बचत गटातील सर्वोत्कृष्ट कार्य करणारी महिला, तसेच गावात तंटे होणार नाही व दाखल तंटे सामोपचाराने मिटविण्याचे कार्य करणाऱ्या व्यक्तींना द्यायचे आहे.
पुरस्कार निधीतील एकूण ६३ टक्के रक्कम ग्रामसभेच्या मंजुरीने आणि शासन निकषाप्रमाणे एकूण १३ बाबींवर खर्च करावयाचे असतात. या सूचनांमध्ये १२ व्या क्रमांकावर गावातील वाचनालयावर खर्च करण्याचे स्पष्ट निर्देश आहे. मात्र मारेगाव तालुक्यातील ३० पुरस्कार प्राप्त गावांपैकी केवळ कोलगाव ग्रामपंचायतीने वाचनालयासाठी पाच हजार रूपये खर्ची केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. उर्वरित ग्रामपंचायतींनी शासन निर्देशांचे पालनच केले नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अखेर तंटामुक्त गाव मोहिमच गावकऱ्यांतील वादामुळे तंट्यात सापडली आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Lack of libraries from award money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.