विजेच्या लपंडावाने शेतकरी त्रस्त
By Admin | Updated: October 6, 2014 23:20 IST2014-10-06T23:20:54+5:302014-10-06T23:20:54+5:30
काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे पिकांना पाणी देणे गरजेचे झाले आहे़ पीक वाचविण्याच्या धडपडीत असलेल्या परिसरातील शेतकऱ्यांना विजेच्या लपंडावाचा सामना करावा लागत

विजेच्या लपंडावाने शेतकरी त्रस्त
नांदेपेरा : काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे पिकांना पाणी देणे गरजेचे झाले आहे़ पीक वाचविण्याच्या धडपडीत असलेल्या परिसरातील शेतकऱ्यांना विजेच्या लपंडावाचा सामना करावा लागत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे. दुसरीकडे महावितरण त्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करीत आहे.
विजेच्या दररोजच्या लपाछपीमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत़ वीज वितरण कंपनीचे कर्मचारी मुद्दाम शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे डोळेझाक करीत आहे़ या परिसरात कर्मचाऱ्यांकडे काम अधिक आणि कर्मचारी कमी, अशी अवस्था आहे़ यामुळे कृषी पंपांच्या तक्रारींचे ताबडतोब निराकरण होत नाही़ त्यामुळे बहुतांश शेतकरी खासगी कर्मचाऱ्यांकडून कामे करवून घेतात़ त्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागतो़
नांदेपेरा परिसरातील ट्रान्सफार्मर (कृषी पंप) बंद पडले आहे़ त्यामुळे शेतातील पिकांना पाणी कसे द्यावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे़ या परिसरात विज पुरवठ्यात नेहमी तांत्रिक बिघाड होत असतो. तरीही लाईनमनला जाग येत नाही़ त्यांच्याकडे अनेक गावांचा प्रभार असल्यामुळे शेतकरी भ्रमणध्वनीवरून त्यांच्याशी संपर्क साधतो. त्यांना साहेब तुम्ही केव्हा येता, अशी विचारणा करतात़ परंतु लाईनमन साहेब कधी या गावी, तर कधी त्या गावी असतात़ लाईनमन एक अन् गाव अनेक अशी स्थिती आहे. त्यातच तक्रारींची संख्या वाढत आहे. यामुळे एकाही तक्रारीचे धड निराकरण होत येत नाही़ या परिसरात विद्युत पुरवठा वारंवार बंद राहत असल्याने पिकांचे ओलित होत नाही. परिणामी आर्थिक भुर्दंड तर पडतोच, पण शेतकऱ्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते़ ही समस्या निकाली काढण्याकरिता वरिष्ठांनी लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या समस्या सोडवाव्या, अशी मागणी होत आहे़ (वार्ताहर)