मस्तीखोर बालकांचा फेरफटका ठरला चक्क अपहरणाचा गुन्हा

By Admin | Updated: December 25, 2016 02:31 IST2016-12-25T02:31:46+5:302016-12-25T02:31:46+5:30

बालपणातली मैत्री ही उघड्या माळरानावर हुंदडणाऱ्या वाऱ्यासारखी असते. मित्रासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी राहते.

The kidnapping was a result of the kidnapping of children | मस्तीखोर बालकांचा फेरफटका ठरला चक्क अपहरणाचा गुन्हा

मस्तीखोर बालकांचा फेरफटका ठरला चक्क अपहरणाचा गुन्हा

सुरेंद्र राऊत  यवतमाळ
बालपणातली मैत्री ही उघड्या माळरानावर हुंदडणाऱ्या वाऱ्यासारखी असते. मित्रासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी राहते. सतत आपल्या मित्रांचाच विचार घेऊन मनसुबे आखले जातात. अगदी १० ते १४ वयोगटातील अशाच दोस्तांनी रेल्वेने फेरफटका मारण्याचे ठरविले. त्यात अनुभवी ठरला तो मातापिता नसलेला मुलगा हरिष. परिस्थितीने जगण्याची धडपड करण्याचे बळ हरिषला दिले होते. त्यानेच पुढाकार घेवून आपल्या तीन मित्रांसोबत वर्धा येथून शेगाव गाठले. मौजमस्ती करून हे टोळके वर्धेत परत आले. मात्र त्यांचे हे कृत्य कायद्याच्या भाषेत आणि भांबावलेल्या आई-वडिलांमुळे अपहरणाचा गुन्हा ठरले.

चित्रपटाचं कथानक ठरेल अशी वास्तवादी घटना कळंब येथे घडली. अनाथ बालकांच्या संघर्षकथा असलेले चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. यामध्ये ‘स्लम डॉग मिलेनिअर’, ‘ट्राफ्रीक सिग्नल’ आणि दाक्षिणात्य हिंदी डब सिनेमा ‘हम पाँच’ यांच्या कथानकांशी मिळतीजुळती घटना कळंब येथे घडली.
आई-वडिलांचे छत्र हरवल्यानंतर अगदी बालपणातच जगण्यासाठीचा संघर्ष करण्याची वेळ या वास्तवातील हरिष (काल्पनिक नाव) याच्यावर आली. वडिलांच्या निधनानंतर आईने दुसरा विवाह केला. यानंतर काही दिवसातच आईचाही मृत्यू झाला. त्यामुळे सावत्र पित्याने दुसरा विवाह केला. आपसुकच हरिषला घराबाहेर काढले. कळंबच्या हलबीपुरा भागात राहणाऱ्या हरिषची ही कहाणी आहे.
सावत्र वडिलाच्या घरासमोर असलेल्या टपरीवजा किराणा दुकानात त्याने आश्रय घेतला. त्याची ही परिस्थिती पाहून काही सद्हृदयी माणसांनी त्याला कोटंबा येथील तथागत विद्यालयात दाखल केले. मात्र इयत्ता आठवीतच त्याची शाळा सुटली. त्यानंतर हरिषचा जगाशी संघर्ष सुरू झाला. मिळेल तिथे काम करायचे आणि आलेला दिवस ढकलायचा, इतकीच त्याची दीनचर्या होती. या दु:खाच्या स्थितीतही वस्तीतील त्याचे सवंगडी मात्र कायम त्याच्यासोबत सावलीसारखे राहात होते. कामातून उसंत मिळाली की हरिष हलबीपुरा भागातील सवंगड्यांसोबत खेळात रमायचा. एक दिवस या बच्चेकंपनीने रेल्वेतून प्रवास करण्याचा बेत आखला. मग जायचे कुठे? तर शेगाव येथील आनंदसागरला जाऊन मौजमजा करायची, असे ठरले. १०, १२ आणि १३ या वयोगटातील दोस्तांमध्ये १४ वर्षांचा हरिषच थोडा मोठा होता. त्यामुळे या बेताची जबाबदारी त्याने स्वीकारली. ठरल्याप्रमाणे ही मंडळी ४ डिसेंबरला घरून निघून गेले. त्यांनी कुणालाही कुठे जाणार आहोत, याची माहिती दिली नाही. त्यांनी वर्धा येथून शेगाव गाठले. त्यांनी विनातिकीट रेल्वे प्रवासचा मनसोक्त आनंद लुटला. संपूर्ण दिवस शेगावात घालवल्यानंतर सायंकाळी ते वर्धेत परत आले. येथे आल्यानंतर कळंबच्या एका युवकाला या चौघांचा कंपू दिसला. त्याने ही माहिती त्यांच्या आई-वडिलांना दिली. दोन दिवसांपासून मुलं बेपत्ता असल्याने इकडे तिघांच्याही आई-वडिलांचा जीव टांगणीला लागला होता. त्यामुळे ही माहिती मिळताच सर्वांनी तत्काळ वर्धा रेल्वे स्टेशन गाठले. दरम्यान, आता आपल्यालाच सर्वजण दोषी ठरवून बेदम मारतील, या भीतीने हरिष तेथून पसार झाला. इथेच त्याच्या माथ्यावर अपहरणाचा गुन्हा नोंदविला गेला. हरिष हा मुलांना मुंबईला विकण्यासाठी नेत होता, असाही आरोप त्याच्यावर लावण्यात आला.
या प्रकरणात त्या तीन मुलांच्या मात्यापित्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी हरिषविरोधात अपहरणासारखा गंभीर गुन्हा नोंदविला गेला. त्यानंतर या गुन्ह्याचा अधिकृत तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रशेखर ठाकरे, अशोक गायकी यांच्याकडे सोपविण्यात आला. या घटनेनंतर हरिष लगेच कळंब येथे परत आला. त्यानंतरच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. महिला व बालकल्याण समितीपुढे हरिषचा जवाब नोंदविला गेला. यातूनच या अपहरणाच्या गुन्ह्याचे वास्तव पुढे आले. गावगाड्यात जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या हरिषचा कुणी वाली नसल्याने त्याच्यावर याहीपूर्वी छोट्या-मोठ्या घटनेत आरोप झाले आहेत.
मात्र, पोलिसांनी याची कुठे अधिकृत नोंद घेतली नव्हती. ही घटना मात्र भावनिक असल्याने शेवटी हरिषची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. वस्तीतील सवंगड्यांसोबत त्यांच्या कट्ट्यावर बसून ठरलेला बेत थेट हरिषला सुधारगृहात घेवून गेला. या वास्तवादी घटनेतून एखाद्या दर्जेदार चित्रपटाची निर्मिती होईल, इतके पैलू आहेत.

Web Title: The kidnapping was a result of the kidnapping of children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.