जूनमध्ये ७१ टँकरने ८१ गावांना पाणीपुरवठा
By Admin | Updated: June 18, 2016 02:00 IST2016-06-18T02:00:59+5:302016-06-18T02:00:59+5:30
गतवर्षीच्या अपुऱ्या पावसाने कधी नव्हे ते जिल्ह्याला उन्हाळाभर भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागला.

जूनमध्ये ७१ टँकरने ८१ गावांना पाणीपुरवठा
जलस्रोतात घसरण : घाटंजी तालुक्यात परिस्थिती हाताबाहेर, शेतकऱ्यांसोबत प्रशासनालाही पावसाची प्रतीक्षा
यवतमाळ : गतवर्षीच्या अपुऱ्या पावसाने कधी नव्हे ते जिल्ह्याला उन्हाळाभर भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागला. जून महिन्यात पाणीटंचाईचे शुक्लकाष्ट संपेल अशी प्रशासनासोबतच सर्व सामान्यांना आशा होती. मात्र जून महिना अर्धा संपला तरी पावसाचा पत्ता नाही. परिणामी ८१ गावातील नागरिकांची तहान भागविण्यासाठी ७१ टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे.
यवतमाळ जिल्ह्यात यावर्षी फेब्रुवारी महिन्यापासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. परंतु जून महिना आला की संपेल, अशी अपेक्षा सर्वांनाच होती. मात्र राज्यात मान्सूनचे आगमन लांबले. याचा फटका जिल्ह्यालाही बसला. जिल्ह्याच्या भूजल पातळीत अर्धा मीटरने घसरण नोंदविली गेली. पेयजलाची स्थिती अधिकच बिकट झाली. यावर मात करण्यासाठी टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. काही गावात बैलगाडीच्या मदतीने पाणीपुरवठा होत आहे. काही गावात विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या.
जिल्ह्यात सर्वाधिक भीषण परिस्थिती जून महिन्यात घाटंजी तालुक्यात निर्माण झाली आहे. सर्वाधिक १७ टँकरच्या मदतीने पाणी पुरवठा केला जात आहे. आर्णी तालुका ११, नेर चार, महागाव दोन, वणी एक, पुसद १५, दारव्हा दोन, उमरखेड दोन, राळेगाव दोन, पांढरकवडा एक असा टँकरने पाणी पुरवठा होत आहे. ८५ गाववाड्या, वस्त्या आणि पोडावर टँकर अथवा बैलगाडीने पाणी पुरवठा केला जात आहे. यामध्ये १२ खासगी आणि ५९ शासकीय टँकरचा समावेश आहे.
जून महिन्यात कधी नव्हे ती भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावागावातील जलपातळी आणखी खालवत आहे. मध्यंतरी झालेल्या अकाली पावसाने दिलासा मिळाला होता. मात्र गत १५ दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे शेतीची कामे खोळंबली असून व पाणीटंचाईचा प्रश्नही तीव्र झाला आहे. यवतमाळ, पुसद शहराला आठ दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे. प्रशासनावरही पाणी पुरवठ्याचा ताण वाढत असून कधी एकदा पाऊस बरसतो आणि पाणीटंचाई संपुष्टात येते याकडे प्रशासनाचे लक्ष लागले आहे. (शहर वार्ताहर)