जलयुक्त शिवार अभियानाला गालबोट
By Admin | Updated: June 24, 2016 02:40 IST2016-06-24T02:40:06+5:302016-06-24T02:40:06+5:30
पाणीटंचाईवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सुरु असलेल्या सिमेंट नाला ...

जलयुक्त शिवार अभियानाला गालबोट
निकृष्ठ बंधाऱ्यांची निर्मीती : तालुक्यातील सिमेंट बंधारे कामात गैरप्रकार
कळंब : पाणीटंचाईवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सुरु असलेल्या सिमेंट नाला बंधाऱ्याचे काम निकृष्ठ केल्या दर्जाचे होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कळंब तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानाला गालबोट लागले आहे.
तरोडा येथे उभारण्यात येत असलेल्या सिमेंट बंधाऱ्याची तपासणी उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी नुकतीच केली. त्यांच्या पाहणीतही बंधाऱ्याची उपयोगिता व गुणवत्तेच्या प्रश्नावर बोट ठेवण्यात आले होते.
कळंब तालुक्यात पाणीटंचाईवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सुरु असलेल्या सिमेंट नाल्यांच्या कामात प्रचंड गैरप्रकार होत आहे. बंधाऱ्याचे काम निकृष्ठ दर्जाचे केल्या गेले. आता तर कामही थांबविण्यात आले आहे. त्यामुळे या बंधाऱ्याची उपयोगिता व गुणवत्ता तपासण्याची मागणी करण्यात आली आहे. तरोडा येथील तीन सिमेंट बंधाऱ्यांची निर्मिती बेंबळा कॅनॉल विभागाच्यावतीने करण्यात आली. परंतु बंधारे बांधण्यात कुठलेही तांत्रिक कौशल्य वापरल्या गेले नाही. प्राकलनानुसार कामेच करण्यात आलेली नाही. बंधाऱ्याची खोली बहुतेक ठिकाणी राखल्या गेली नाही. केवळ थातुरमातूर कामे करण्यात धन्यता मानण्यात आली. मातीचे केवळ ढिगारे मारण्यात आले. कुठेही बर्म सोडण्यात आले नाही. आवश्यक ठिकाणी माती वाहून नेणे गरजेचे असताना एकही ब्रास माती वाहून नेण्यात आली नाही. त्यामुळे आतापासूनच माती नाल्यात पडू लागली आहे. वास्तविकपणे खोदलेली माती वाहुन नेण्याचे प्रावधान प्राकलनामध्ये समाविष्ठ आहे. त्यामुळे जोराच्या पावसात ही माती पुन्हा नाल्यात जमा होईल, अशी स्थिती आहे. त्यामुळे या अनियमितेविषयी आमदार डॉ.अशोक उईके यांनी उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांना पूर्ण चौकशी करण्याची सूचना केली आहे. राजकीय वरदहस्त व अधिकाऱ्यांची टक्केवारी यामुळे हा प्रकार झाल्याचे बोलले जाते. त्यामुळे आता या प्रकरणात जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी गांभिर्याने लक्ष देणे अपेक्षित आहे. सदर कामाच्या संदर्भात उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी दखल घेणे गरजेचे आहे. कारण शासनाची महत्वाकांक्षी असलेली योजना चुकीचे काम होत असल्यामुळे अपयशी ठरण्याची शक्यता आहे. युती शासनाची ‘जलयुक्त शिवार’ ही अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे. बऱ्याच ठिकाणी यामध्ये सुंदर कामे सुरु आहे. परंतु कळंब तालुक्यात या योजनाचा बट्याबोळ करण्याचे काम अधिकारी व कंत्राटदारांनी चालविले आहे. याविषयी येत्या अधिवेशनात संबधितांना धारेवार धरु अशी माहिती आमदार डॉ.अशोक उईके यांनी दिली. (तालुका प्रतिनिधी)