Kedarnath Helicopter Crash: रविवारी पहाटे केदारनाथजवळील गौरीकुंड येथे एक हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्घटना घडली. यामध्ये पायलटसह सर्व ७ प्रवाशांचा मृत्यू झाला. सकाळी ०५:१७ वाजता, आर्यन एव्हिएशनच्या हेलिकॉप्टरने केदारनाथ हेलिपॅडवरून गुप्तकाशीसाठी ६ भाविक आणि पायलटसह उड्डाण केले होते. खराब हवामानामुळे, हेलिकॉप्टर जंगलात कोसळले. हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाला ज्यामुळे सातही जणांचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे या अपघातात महाराष्ट्रातील जयस्वाल दाम्पत्यासह चिमुरडीचा मृत्यू झाला.
केदारनाथ येथे झालेल्या हेलीकॉप्टर दुर्घटनेत वणीतील तिघांचा मृत्यू झाला. राजकुमार जयस्वाल (४१), श्रद्धा जयस्वाल (३२) व काशी जयस्वाल (२ वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेची वार्ता वणी शहरात पोहोचताच, सर्वत्र शोककळा पसरली. १२ जून रोजी काही नातलगांसोबत राजकुमार जयस्वाल, त्यांची पत्नी श्रद्धा जयस्वाल व मुलगी काशी जयस्वाल हे तिघेजण अमरनाथ यात्रेसाठी गेले होते. शनिवारपर्यंत परिसरातील वेगवेगळ्या मंदिरांमध्ये दर्शन घेऊन हे दाम्पत्य हेलिकॉप्टरने अन्य काही भाविकांसोबत केदारनाथकडून रविवारी पहाटे निघाले होते.
यादरम्यान सकाळी ५.३० वाजताच्या सुमारास केदारनाथ परिसरातील गौरीकुंड ते सोनप्रयाग या भागात खराब वातावरणामुळे हेलीकॉप्टर जंगलात कोसळले. या अपघातात हेलीकॉप्टरमधील सातजण जागीच ठार झाले. त्यात वणीतील जयस्वाल कुटुंबाचाही समावेश आहे. रविवारी पहाटे या घटनेची माहिती मिळताच जयस्वाल यांच्या नातलग व मित्रपरिवाराने घरासमोर एकच गर्दी केली. जयस्वाल दाम्पत्यासह दोन वर्षाच्या काशीच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे. मागीलवर्षी राजकुमार जयस्वाल यांच्या पुढाकारात वणीत पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचे मोठे आयोजन करण्यात आले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वाहिली श्रद्धांजली
"आज सकाळी केदारनाथहून गुप्तकाशीला जाताना उत्तराखंडमधील गौरीकुंडजवळ झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात प्रवाशांचा मृत्यू झाला, त्यामुळे खूप दुःख झाले आहे. मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये महाराष्ट्रातील भाविकांचाही समावेश होता. मी शोकाकुल कुटुंबांप्रती माझ्या मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो. आम्ही सर्व बाधितांच्या पाठीशी आहोत," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.