विलास ताजनेलोकमत न्यूज नेटवर्क शिंदोला : कोरोनाच्या संकटात रखडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका पुन्हा घोषित झाल्या. परिणामी गावपातळीवरचं मिनीमंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीचा उत्साह खेड्यापाड्यात दिसून येऊ लागला. साहजिकच कडाक्याच्या थंडीतही ग्रामपंचायत निवडणुकीचे उष्ण वारे वाहू लागले. परिणामी पाच वर्षे गुण्यागोविंदाने एकत्र नांदणाऱ्या मित्र, आप्तेष्ट आणि भावाबंधातच नव्हे; तर घराघरात पुन्हा एकदा ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने आपुलकीपेक्षा अधिक कटुतेची भावना निर्माण होऊ लागल्याचे चित्र गावगाड्यात दिसून येऊ लागले. ग्रामपंचायत निवडणूक म्हटलं की, ‘गावात कुठं फाईट तर कुठं वातावरण टाईट’ अशी स्थिती निर्माण होते. नेत्यांसाठी ग्रामीण भागातील निवडणूक ही सर्वांत प्रतिष्ठेची समजली जाते. आता तर राजकीय पक्षांनी या निवडणुकीत लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुका चुरशीच्या होणार हे निश्चित झाले आहे. निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होताच कडक इस्त्री केलेले कपडे घालून नेते मतदारांना नमस्कार, रामराम ठोकून मिरवू लागले आहेत. ‘मी मिरवणार अन् सगळ्यांची जिरवणार’ जणू काही असा विश्वास त्यांच्या वागण्या-बोलण्यात दिसून येत आहे. सदस्य किंवा सरपंचपदासाठी सातवी उत्तीर्णतेची अट घातली आहे. त्यामुळे अनेक पार्टीप्रमुखांना उमेदवार बदलविण्याची वेळ आली आहे. नवीन उमेदवार शोधताना अरे, तू सातवी पास आहेस का? असा प्रश्न उपस्थित केला जातो. त्यामुळे खेड्यापाड्यातील लहान मोठ्यांच्या तोंडी अरे भाऊ, ये बाई, तू सातवी पास आहेस का? असा प्रश्न सहजपणे विचारला जातो. एकूणच गावागावांत राजकीय वातावरण तापत आहे.
अनेक नवतरूण उतरले निवडणुकीच्या रिंगणात कोरोनामुळे पुणे, मुंबईतील खासगी नोकरी गमावलेले अनेक तरूण मुले-मुली गावात वास्तव्यास आहेत. यापैकी अनेकांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची मानसिकता तयार केली आहे. अनेक गावात उच्च शिक्षित मुला-मुलींनी राजकारणात प्रवेश केल्याचे चित्र आहे.