शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिवसेनेने कर्मचाऱ्यांना कोंडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2015 01:26 IST2015-05-19T01:26:16+5:302015-05-19T01:26:16+5:30
शासनाने घोषित केलेली दुष्काळी मदत चार महिने झाले तरी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही. त्यामुळे

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिवसेनेने कर्मचाऱ्यांना कोंडले
तहसीलला ठोकले कुलूप : चार महिन्यांपासून मदत मिळाली नाही
बाभूळगाव : शासनाने घोषित केलेली दुष्काळी मदत चार महिने झाले तरी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या बाभूळगाव येथील शिवसैनिकांनी चक्क तहसील इमारतीच्या मुख्य गेटला कुलूप लावून कर्मचाऱ्यांना कोंडले. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली.
तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी मदतीचे पैसे शासनाने घोषित केले. तलाठ्यांनी याद्या आणि खाते क्रमांक दिल्यानंतर त्यांचे पैसे खात्यांमध्ये जमा होणे क्रमप्राप्त होते. मात्र चार महिन्यांंपासून शेतकऱ्यांचे पैसे खात्यात जमाच झाले नाही. दररोज शेतकरी तहसीलचे उंबरठे झिजवित आहे. कर्मचारी टोलवा टोलवी करीत आहे. या प्रकरणी जाब विचारण्यासाठी सोमवारी सायंकाळी ५.३० वाजता शिवसेनेचे तालुका प्रमुख जनार्दन झाटे, माजी तालुका प्रमुख भानुदास राऊत, शहर अध्यक्ष नंदू अडेकर, माजी शहर अध्यक्ष रवींद्र काळे तहसील कार्यालयात पोहोचले. या ठिकाणी तहसीलदार किरण सावंत पाटील यांच्या कक्षात गेले. तेथे तहसीलदार बैठकीसाठी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे शिवसैनिक संतप्त झाले. इमारतीच्या मुख्य चानल गेटला कुलूप ठोकले आणि तेथेच शिवसैनिकांनी ठिय्या दिला. जोपर्यंत योग्य न्याय मिळत नाही तोपर्यंत येथून हटणार नाही, अशी भूमिका घेतली. या कार्यालयातील सुमारे ३० कर्मचारी या आंदोलनामुळे कार्यालयाच्या आत अडकून पडले.
या आंदोलनाची माहिती होताच बाभूळगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शिवसैनिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी बाभूळगाव येथे खासदार भावना गवळी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे शिवसैनिकांनी खासदार गवळी आल्यानंतरच बोलणी करू, असे सांगितले. वृत्त लिहेस्तोवर कर्मचारी आतमध्येच कोंडून होते. (प्रतिनिधी)
सत्ताधारीच उतरले आंदोलनात
४राज्यात शिवसेना आणि भाजपाची सत्ता आहे. पूर्वी आघाडी सरकारमध्ये शिवसेना नेहमी आपल्या स्टाईलने आंदोलन करीत होती. सत्ता आल्यानंतर आपले प्रश्न सहज सुटतील, असे त्यांना वाटत होते. मात्र प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने बाभूळगाव येथील सत्ताधारी शिवसेनेला आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागला. याचीच चर्चा बाभूळगाव शहरात सोमवारच्या आंदोलनाने होती.