वाळीत टाकण्याच्या भीतीतून ऑनरकिलिंग
By Admin | Updated: May 15, 2014 23:55 IST2014-05-15T23:55:50+5:302014-05-15T23:55:50+5:30
अनैतिक संबंधामुळे समाजात बदनामी होईल, एवढेच नाही तर जात पंचायत वाळीत टाकेल. त्यामुळे दोन मुलींचे लग्न कसे करावे या भीतीतून संगीताचा कायमचा काटा

वाळीत टाकण्याच्या भीतीतून ऑनरकिलिंग
यवतमाळ : अनैतिक संबंधामुळे समाजात बदनामी होईल, एवढेच नाही तर जात पंचायत वाळीत टाकेल. त्यामुळे दोन मुलींचे लग्न कसे करावे या भीतीतून संगीताचा कायमचा काटा काढल्याची कबुली मारेकरी आजोबा आणि मामाने दिली. तसेच पारवा पोलिसांपुढे दोघांनी घटनेचे प्रात्यक्षिकही करून दाखविले. घाटंजी तालुक्यातील बोधडी येथील संगीता बाबूलाल गाडेकर या तरुणाचा खून झाल्याचे उघडकीस आले होते. तिचा खून आजोबा काशीराम भवान्या टेकाम आणि मामा शाम काशीराम टेकाम यांनी केल्याचे पोलीस तपासात पुढे आले. १६ फेब्रुवारीपासून संगीता रहस्यमयरीत्या बेपत्ता होती. त्यानंतर २८ फेब्रुवारीला एका मुलीचा मृतदेह पाटापांगरा येथील जंगलात कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. हा मृतदेह संगीताचाच असल्याची खात्री पटवायला तब्बल साडेतीन महिन्यांचा कालावधी लागला. त्यानंतर गोपनीय माहिती आणि संशयावरून आजोबा काशीराम व मामा शाम यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत दोघांनीही संगीताचा ओढणीने गळा आवळून खून केल्याची कबुली दिली. काशीराम आणि शाम ज्या समाजाचा घटक आहे त्या समाजात जात पंचायत भरते. एखाद्या कुटुंबातील मुलीचे अनैतिक संबंध पुढे आल्यास पंचायत त्या कुटुंबाला वाळीत टाकते. त्यानंतर वाळीत टाकलेल्या कुटुंबातील मुलीशी कुणीही बोलतसुद्धा नाही तेव्हा लग्न तर दूरचीच बाब. संगीताच्या बाबतीतही नेमके हेच झाले. काशीराम आणि शाम या दोघांना तिचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. मात्र ती याबद्दल काही एक सांगत नव्हती. त्यामुळे संगीताचे अनैतिक संबंध समाजाला माहीत झाले तर आपल्याला वाळीत टाकले जाईल, शिवाय संगीताच्या दोन बहिणींशी कुणीही लग्न करणार नाही, अशी भीती काशीराम आणि शामला होती. त्यातूनच आपण संगीताचा खून केल्याची कबुली पांढरकवडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी बी.एस. महाजन आणि पारवा ठाणेदार संजय शिरभाते यांच्यापुढे त्यांनी दिली. तसेच घटनेचे प्रात्यक्षिकही करून दाखविले. (स्थानिक प्रतिनिधी)