बेमौसम बदल्यांना महानिरीक्षकांचा चाप
By Admin | Updated: September 3, 2014 00:03 IST2014-09-03T00:03:49+5:302014-09-03T00:03:49+5:30
हंगाम नसताना आणि पूर्व परवानगीविना केलेल्या सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांना अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बिपीन बिहारी यांनी चाप लावला आहे.

बेमौसम बदल्यांना महानिरीक्षकांचा चाप
यवतमाळ : हंगाम नसताना आणि पूर्व परवानगीविना केलेल्या सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांना अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बिपीन बिहारी यांनी चाप लावला आहे.
गेल्या आठवड्यात इतर जिल्ह्यातील यवतमाळात निवडणुकीच्या अनुषंगाने बदलून आलेल्या सहायक पोलीस निरीक्षकांच्या (एपीआय) स्थानिक नियुक्त्यांचे आदेश जारी करण्यात आले. सुमारे १६ एपीआयच्या नियुक्त्या केल्या गेल्या. त्या आड शिरपूर आणि वणी वाहतूक शाखेच्या प्रमुखांनाही बदलविले गेले.
‘एलसीबी’मध्ये अखेर ‘तडजोड’
स्थानिक गुन्हे शाखेतील दोन अधिकाऱ्यांची भांडणे, अधिकारातील कपात हे विषय जिल्हाभर पोलीस दलात चर्चेचे ठरले आहे. आता नव्या एसपींच्या कार्यकाळात हा वाद वाढू नये म्हणून दोनही अधिकाऱ्यांनी जुळवून घेतल्याचे सांगितले जाते. पुढील ‘हिशेबा’साठी ग्रीन सिग्नल मिळतो का, याची एलसीबीत प्रतीक्षा आहे. प्रशासनाला त्रस्त करून राजकीय मार्गाने एलसीबी मिळविलेल्या या दोनही अधिकाऱ्यांवर पोलीस महानिरीक्षकांची तीव्र नाराजी मात्र कायम आहे. गणेशोत्सवानंतर लगेच या नाराजीचा फटका त्यांना सहन करावा लागण्याचीही दाट शक्यता आहे. एलसीबीप्रमाणेच जिल्हा वाहतूक शाखा, वणी, दारव्हा, पांढरकवडा ठाणेदारांवरही महानिरीक्षकांची नाराजी असून त्याचा प्रत्यय त्यांना गणेशोत्सवादरम्यानच्या क्राईम मिटींगमध्ये आलासुध्दा. त्यांनाही संभाव्य फेरबदलाचा फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.