निराधारांचा आक्रोश कायम

By Admin | Updated: August 7, 2015 02:26 IST2015-08-07T02:26:01+5:302015-08-07T02:26:01+5:30

तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या वृद्ध निराधारांचा काहीही दोष नव्हता.

The inmates of the underworld persisted | निराधारांचा आक्रोश कायम

निराधारांचा आक्रोश कायम

जूनपासून अनुदान सुरू : सहा महिन्यांची थकबाकी २६ लाख रूपये मिळणार काय?
अण्णाभाऊ कचाटे मारेगाव
तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या वृद्ध निराधारांचा काहीही दोष नव्हता. तहसीलच्या संजय गांधी योजना विभागातून त्यांचे अर्ज व प्रोसिडींगच गहाळ झाले होते. परिणामी गेल्या सहा महिन्यापासून पात्र निराधारांचे अनुदान बंद होते. आता हे अनुदान जून २०१५ पासून नव्याने नियमित सुरू करून निराधारांना तहसील प्रशासनाने दिलासा दिला आहे. तथापि गेल्या सहा महिन्याचे थकित अनुदान मिळविण्यासाठी निराधारांचा आक्रोश अद्याप सुरूच आहे.
मारेगाव तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत संजय गांधी योजनेचे ६७४ व श्रावणबाळ, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेचे एक हजार १२४ असे एकूण एक हजार ७९८ लाभार्थी होते. त्यांना नियमित अनुदान वाटपाची प्रक्रिया सुरू होती. मात्र वरिष्ठ कार्यालयाच्या निर्देशानुसार लाभार्थ्यांची बँकनिहाय, लाभार्थीनिहाय व योजनानिहाय, इतिवृत्तानुसार प्रकरणे शोधनू व्यवस्थित लावताना संजय गांधी योजना विभागातून संजय गांधी व इतर योजनांच्या ७६६ लाभार्थ्यांची प्रकरणे व इतिवृत्त असे महत्वाचे दप्तरच गहाळ असल्याचे आढळून आले होते.
या प्रकरणाचा फारसा शोध न घेता डिसेंबर २०१४ पासून अचानक ७६६ लाभार्थ्यांचे अनुदान बंद करण्यात आले होते. लाभार्थी मात्र बँकेत जाऊन बँक व्यवस्थापकासोबत अनुदानाबाबत हुज्जत घालत होते. आमच्या प्रतिनिधीने माहिती अधिकारात माहिती मिळवून तसे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. ते वृत्त प्रकाशित होताच तालुक्यातील निराधारांमध्ये एकच आक्रोश सुरू झाला. लाभ बंद झालेले लाभार्थी शासन, लोकप्रतिनिधी, अधिकारी व कार्यकर्त्यांना शिव्याशाप घालत होते. काही राजकीय लोकांनी या प्रकरणाचा आपल्या स्वार्थासाठी राजकीय वापरही केला होता.
यानंतर ‘लोकमत’मधील २७ फेब्रुवारी, २५ मार्च, १४ मे रोजी निराधारांचे अर्ज गहाळ, निराधारांचा प्रचंड आक्रोश या शिर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या वृत्ताने तहसील प्रशासनाला खडबडून जाग आली. विद्यमान तहसीलदार डॉ.संतोष येवलीकर यांना वृद्धाचा आक्रोश ऐकून कणव आली. त्यांनी अनुदान बंद करण्यात आलेल्या प्रकरणात मंडळनिहाय नि:शुल्क शिबिरांचे आयोजन केले. त्या शिबिरांत गहाळ ७६६ प्रकरणातील हजर झालेल्या विविध योजनांच्या ५४४ लाभार्थ्यांचे नव्याने अर्ज भरून घेतले. त्यांना इतिवृत्तात मंजुरी देऊन अखेर जून २०१५ चे अनुदान बँकनिहाय लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करणे सुरू केले. त्यामुळे वृद्ध निराधारांना दिलासा मिळाला आहे.
या शिबिरांमध्ये ६६ लाभार्थी मयत, तर पाच गाव सोडून गेल्याचे आढळून आले होते. शिबिरात न येऊ शकणाऱ्या १८१ लाभार्थ्यांचे योजनानिहाय अर्ज संबंधित तलाठ्यांमार्फत भरून घेण्याची कारवाई आता सुरू असून त्यांना तत्काळ मंजुरी देऊन त्यांचे अनुदानसुद्धा नव्याने पाठविले जाणार असल्याचे डॉ.येवलीकर यांनी सांगितले. बंद झालेल्या सर्व लाभार्थ्यांचे अनुदान नव्याने सुरू होईल. मात्र त्यांच्या सहा महिन्याच्या थकित अनुदानाचे काय, हा प्रश्न कायम आहे. विविध योजनांतर्गत लाभास पात्र ७२५ निराधारांचे गेल्या सहा महिन्यांपासूनचे सुमारे २६ लाख रूपये थकित असलेले अनुदानसुद्धा लाभार्थ्यांना दिले जावे. त्यामधून प्रत्येक निराधारास सहा महिन्यांचे तीन हजार ६०० रूपये थकबाकी मिळण्याची अपेक्षा असून वृद्ध निराधार या थकित रकमेची चातकाप्रमाणे वाट पाहत आहे. या थकित रकमेबाबत जिल्हाधिकाऱ्यांना संगायो तहसीलदार परवानगी मागणार असल्याची माहिती देण्यात आली.
जिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाईची अपेक्षा
संजय गांधी विभागातील कर्मचाऱ्यांच्या चूक व हलगर्जीणाने अर्ज गहाळ झाले आहे. त्यामुळे तालुक्यातील ७२५ निराधारांना गेल्या सहा महिन्यापासून अनुदान मिळाले नाही. ते अनुदानापासून वंचित राहिले. जगण्यासाठी त्यांची धावाधाव सुरू होती. अनेक लाभार्थी वृद्ध असल्याने त्यांना अनुदान का बंद झाले, याची चौकशी करणेसुद्धा कठीण झाले होते. अनुदान बंद झाल्याने त्यांच्या समोर जगण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. या लाभार्थ्यांची कागदपत्रे गहाळ करून त्यांना अनुदानापासून वंचित ठेवणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांवर मात्र अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे आता याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनीच लक्ष देऊन एखाद्या समितीमार्फत या प्रकरणाची चौकशी करणे गरजचे आहे. कामात हयगय करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांविरूद्ध कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे. सोबतच संजय गांधी योजना विभागातील इतर आवश्यक दस्तऐवज तरी ठिकाणावर आहे की नाही, याचाही शोध घेणे गरजेचे आहे. अन्यथा हे कर्मचारी निर्धास्तपणे महत्त्वाचे शासकीय दस्तऐवज नेहमी गहाळ करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Web Title: The inmates of the underworld persisted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.