शेतमालाच्या आधारभूत किमतीत अन्याय
By Admin | Updated: June 19, 2016 02:16 IST2016-06-19T02:16:59+5:302016-06-19T02:16:59+5:30
शेतमालाची आधारभूत किंमत घोषित करताना केंद्र ्रसरकारने याहीवर्षी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहे.

शेतमालाच्या आधारभूत किमतीत अन्याय
शेतकरी संघटना : शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली
यवतमाळ : शेतमालाची आधारभूत किंमत घोषित करताना केंद्र ्रसरकारने याहीवर्षी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहे. सलग तिसऱ्या वर्षी शेतकऱ्यांवर घोर अन्याय केला आहे. शेतकऱ्यांना आधार देण्या ऐवजी नगण्य भाववाढ करून त्यांचा विश्वासघात केला, असा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे.
शेतमाल उत्पादन खर्चात दरवर्षी सतत वाढ होत आहे. मात्र उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी दाभडी (ता. आर्णी) येथे नरेंद्र मोदी यांनी उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा भरून शेतमालाचे दर ठरविले जाईल असे जाहीर केले होते. शिवाय इतर ठिकाणी झालेल्या सभांमध्येही त्यांनी हे आश्वासन दिले होते. मात्र २०१६-१७ या वर्षाकरिता जाहीर झालेल्या खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमती पाहता नगण्य वाढ दिली आहे. कापूस व धानाला केवळ ६० रुपये प्रती क्विंटल वाढ दिली. देशात तेलबिया व खाद्यतेलाचा तुटवडा असताना सोयाबीनवर केवळ ६.७ टक्के म्हणजे १७५ रुपये वाढ केली आहे. धानाची आता आधारभूत किंमत एक हजार ४७० रुपये आखुड धाग्याच्या कापसाला तीन ८६० रुपये व लांब धाग्याच्या कापसाला चार हजार १६० रुपये घोषित करून शेतकऱ्यांची क्रुर चेष्टा केली आहे. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांचा सरकारला विसर पडल्याचे शेतकरी संघटनेने म्हटले आहे.
शासनाने शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी अॅड़ वामनराव चटप, सरोजताई काशीकर, गुणवंत पाटील हंगरगेकर, शैला देशपांडे, संजय कोले, मधु भरणे, अनिल घनवट, जगदीश नाना बोंडे, माया पुसदेकर, नाना खांदवे, दवेंद्र राऊत, विजय निवल, देवराव पाटील धांडे, प्रज्ञा चौधरी, जयंतराव बापट, मारोतराव काळे, बापू पाटील चौधरी, दशरथ बोबडे, रमेश मांगुळकर, दीपकअण्णा आनंदवार, बाळासाहेब देशमुख, नारायणराव बोरकर, इंदरचंद बैद, राजू कुंचटवार, वैकुंठराव मुंडे, शरद पडगीलवार, हसनराव देशमुख, बबनराव चौधरी, चंद्रशेखर देशमुख यांनी केली आहे. (वार्ताहर)