कपाशीवर मर रोगाचा प्रादुर्भाव

By Admin | Updated: July 31, 2015 00:12 IST2015-07-31T00:12:28+5:302015-07-31T00:12:28+5:30

तालुक्यातील साखरा, कोलगाव, माथोली व जुगाद परिसरात कपाशीवर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले आहे.

Inflammation of the disease on cotton | कपाशीवर मर रोगाचा प्रादुर्भाव

कपाशीवर मर रोगाचा प्रादुर्भाव

शेतकरी संकटात : तूर्तास २०० एकराला बसला फटका, पावसाअभावी झाडे कोमेजण्यास सुरूवात
वणी : तालुक्यातील साखरा, कोलगाव, माथोली व जुगाद परिसरात कपाशीवर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले आहे. कृषी विभागाच्या पाहणीतच हे स्पष्ट झाले आहे. या परिसरातील कपाशीला ‘पॅराविल्ट‘ नावाच्या मर रोगाची लागण झाल्याचे दिसून आले आहे.
यावर्षी तालुक्यात ४७ हजार ९९ हेक्टरवर कपाशीची पेरणी करण्यात आली आहे. आठ हजार २०० हेक्टरवर सोयाबीन, पाच हजार ८३७ हेक्टरवर तूर, ४८३ हेक्टरवर ज्वारी, ६० हेक्टरमध्ये मूग, तर ६५ हेक्टरांत उडीदाची पेरणी झाली. खरीपात ६६८ हेक्टरमध्ये इतर पिके व भाजीपाल्याची लागवड करण्यात आली आहे. एकूण ६२ हजार ४१२ हेक्टरमध्ये खरीपाची पेरणी झाली. सुरूवातीला समाधानकारक पावसामुळे पेरणी साधली. मात्र त्यानंतर तब्बल महिनाभर पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील हिरवे हास्य लोप पावले होते. पावसाच्या या दडीमुळे तालुक्यात एक हजार २६० हेक्टरमधील सोयाबीन करपण्यास सुरूवात झाली होती. त्यावेळी १०० हेक्टरातील कपाशीही सुकण्यास सुरूवात झाली होती. परिणामी शेतकरी पुन्हा संकटात सापडले होते.
आता सात दिवसांपूर्वी तालुक्यात पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला होता. पिकासाठी हा पाऊस समाधानकारक ठरला होता. मात्र पुन्हा गेल्या सात दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी आणखी संकटात सापडले आहेत. गेली दोन वर्षे अतिवृष्टी आणि दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांवर आता यावर्षीही पुन्हा संकट कोसळले आहे. अनेक शेतकरी पीक जगविण्यासाठी धडपड करीत आहे. मात्र ओलिताची सुविधा नसल्याने बहुसंख्य शेतकरी निसर्गाच्या पावसावरच अवलंबून आहेत.
गेल्या सात दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने आता कपाशीवर मर रोगाचा प्रादुर्भाव वाढीस लागला आहे. तालुक्यातील साखरा, कोलगावर, जुगाद, माथोली आदी परिसरात कपाशीवर या रोगाची लक्षणे दिसू लागली आहे.
या परिसरातील कपाशीची पाने आता शेंड्यापासून खालपर्यंत मलूल होत आहे. नंतर ती सुकून पानांची गळ होत आहे. त्यानंतर काही झाडे आता वाळली आहेत. या मर रोगामुळे आता शेतकऱ्यांवरच पुन्हा मरणकळा आणाली आहे. पाऊस नसल्याने आणि याआधीही कमी पाऊस झाल्याने कपाशीच्या झाडांना अन्नद्रव्य शोषण करता येत नाहीत. परिणामी कपाशीची झाडे आता वाळू लागली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
आंतरप्रवाही किटकनाशकांची फवारणी आवश्यक
तालुका कृषी विभागाने कपाशीवर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने मान्य केले आहे. या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी कपाशीवर कॉपर आॅक्सीक्लोराईड २५ ग्रॅम अधिक १०० ग्रॅम युरिया, १० लीटर पाणी किंंवा कार्बेडेंझीम १० ग्रॅम अधिक १०० गॅ्रम व युरीया १० लीटर पाण्यात टाकून हे द्रावण स्प्रे पंपाचे नोझल काढून प्रती झाड १०० मीली मुळाजवळ टाकावे, असे आवाहन केले आहे. आंतरप्रवाही किटकनाशकाची फवारणी तत्काळ करावी, अससाही सल्ला दिला आहे. अधिक माहितीसाठी कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक व कृषी मंडळ अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी रमेश पसलवाड यांनी केले.
कृषी शास्त्रज्ञांना केले वणीत पाचारण
तालुक्यात काही परिसरात कपाशीवर मर रोगाने आक्रमण केल्याने तालुका कृषी विभाग हादरून गेला आहे. या संकटाच्या काळात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि त्यांना विविध प्रभावी उपाययोजना सांगण्यासाठी आता कृषी शास्त्रज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. या रोगाची पाहणी करण्याकरिता आता शुक्रवारी काही कृषी शास्त्रज्ञ वणी तालुक्यात दाखल होणार आहेत. ते सर्वाधिक प्रभावीत झालेल्या कोलगाव, साखरा, जुगाद आदी परिसरात कपाशीची पाहणी करून उपाययोजना सुचविणार आहेत.
झाडांची मुळे कुजण्याची प्रक्रिया झाली सुरू
मर रोगाच्या आक्रमणामुळे आता काही परिसरात कपाशी झाडांची मुळे कुजण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पावसाअभावी झाडांना अन्नद्रव्य शोषता येत नसल्याने पाने वाळू लागली आहे. पाने वाळल्यानंतर मुळे कुजण्याची प्रक्रिया सुरू होते. तालुक्यात सध्या किमान २०० एकरातील कपाशी या अवस्थेत आहे. त्यावर त्वरित फवारणी न केल्यास ही सर्वच कपाशी वाळून जाण्याची शक्यता बळावली आहे. पावसाची तडण बसल्याने केवळ चारच दिवसांत मर रोगामुळे कपाशीचे नुकसान होऊ शकते. रोगाची लागण होताच चारच दिवसांत कपाशी वाळते. त्यामुळे आता तातडीने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Web Title: Inflammation of the disease on cotton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.