दाभडीच्या विकासासाठी स्वतंत्र विकास आराखडा

By Admin | Updated: March 24, 2015 01:02 IST2015-03-24T01:02:24+5:302015-03-24T01:02:24+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘चाय पे चर्चा’ने चर्चेत आलेल्या दाभडी गावाच्या विकासासाठी

Independent development plan for the development of Dabadi | दाभडीच्या विकासासाठी स्वतंत्र विकास आराखडा

दाभडीच्या विकासासाठी स्वतंत्र विकास आराखडा

मुख्यमंत्र्यांचे निर्देश : ग्रामसभेत १०८ ठराव मंजूर, ५० कोटींचे बजेट, महसूल विभागांतर्गत समस्यांचा अंतर्भाव
हरिओम बघेल  आर्णी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘चाय पे चर्चा’ने चर्चेत आलेल्या दाभडी गावाच्या विकासासाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
२० मार्च २०१४ ला लोकसभा निवडणुकीपूर्वी आर्णी तालुक्याच्या दाभडी गावातून मोदींनी देशभरातील शेतकऱ्यांशी ‘चाय पे चर्चा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधला होता. त्या दिवसाची यंदाच्या २० मार्चला आठवण करून देत काँग्रेसने ‘चाय की चर्चा’ हा कार्यक्रम दाभडीत आयोजित केला. मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी काहीच केले नाही, त्यामुळे शेतकरी आत्महत्या कायम असल्याचे सांगत काँग्रेसने काळा चहा वाटून भाजपाचा निषेध केला. दाभडीच्या आडोशाने माजी मंत्री शिवाजीराव मोघे आणि काँग्रेसने मोदी व भाजपाला टार्गेट केल्याचे पाहून आता राज्यातील भाजपा सरकारनेही काँग्रेसला प्रतिउत्तर देण्याचे ठरविले आहे. रविवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दाभडी गावातील विकासाच्या अनुषंगाने यवतमाळचे आमदार मदन येरावार यांच्याशी चर्चा झाली. दाभडी गावाच्या सर्वांगीण विकासाचा स्वतंत्र आराखडा तयार करण्याच्या सूचना ना. फडणवीस यांनी येरावार यांना दिल्या. या आराखड्यासाठी कितीही निधी लागला तरी चालेल असे फडणवीस यांनी स्पष्ट केल्याचे सांगितले जाते.
आमदार येरावार यांनी मुख्यमंत्र्यांचा हा संदेश दाभडी गावचे सरपंच संतोष टाके, सदस्य प्रकाश राऊत यांच्याकडे पोहोचविला. गेल्या साडेचार वर्षांपासून सरपंच असलेल्या टाके यांना दाभडीतील समस्यांची चांगली जाण आहे. त्यांनी लगेच रविवारी सायंकाळीच दाभडीत ग्रामसभा बोलविण्याचे सूचविले. थेट मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातल्याने दाभडीला विकासाची संधी चालून आली आहे. त्यामुळे पक्षभेद व राजकारण विसरुन गावाच्या विकासासाठी एकजूट व्हा, गावाला काय पाहिजे ते सांगा, नेमका कशाचा विकास हवा आहे ते मांडा, गावाला स्वयंपूर्ण करा असे आवाहन या ग्रामसभेत करण्यात आले. गावकऱ्यांच्या अपेक्षा ऐकून घेतल्यानंतर विकास कामांचे तब्बल १०८ ठराव एकमताने या ग्रामसभेत मंजूर करण्यात आले.
या ठरावांसह दाभडीचा सुमारे ५० कोटींचे बजेट असलेला विकास आराखडा सोमवारी तयार करून आमदार मदन येरावार यांच्या नेतृत्वात ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांना सादर करण्यात आला. हा अहवाल घेऊन येरावार स्वत: मुंबईला जाणार आहेत. दाभडीचे सरपंच संतोष टाके आजारी आहेत. त्यानंतरही त्यांची विकास आराखड्यासाठी धडपड सुरू होती.
या विकास आराखड्यात शेतकऱ्यांच्या समस्या, अंतर्गत रस्ते, सांडपाणी, नळ योजना, बँक, आरोग्य केंद्र, शेततळ्यातील गाळ उपसणे, पांदण रस्ते, शिक्षण, महसूल विभागाच्या समस्यांचा अंतर्भाव करण्यात आल्याचे ग्रामपंचायत सदस्य प्रकाश राऊत यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

Web Title: Independent development plan for the development of Dabadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.