ग्रामसभा सदस्यांच्या भत्त्यात घसघशीत वाढ

By Admin | Updated: November 12, 2014 22:50 IST2014-11-12T22:50:39+5:302014-11-12T22:50:39+5:30

पंचायत राज व्यवस्थेने ग्रामसभेला विशेष अधिकार दिले असले तरी बहुतांश गावात ग्रामसभेला नगन्य उपस्थिती असते. एवढेच काय ग्रामपंचायत सदस्यही उपस्थित राहण्यास टाळाटाळ करतात. ही बाब लक्षात

Increment in the allowance of Gram Sabha members | ग्रामसभा सदस्यांच्या भत्त्यात घसघशीत वाढ

ग्रामसभा सदस्यांच्या भत्त्यात घसघशीत वाढ

किशोर वंजारी - नेर
पंचायत राज व्यवस्थेने ग्रामसभेला विशेष अधिकार दिले असले तरी बहुतांश गावात ग्रामसभेला नगन्य उपस्थिती असते. एवढेच काय ग्रामपंचायत सदस्यही उपस्थित राहण्यास टाळाटाळ करतात. ही बाब लक्षात आल्याने शासनाने आता ग्रामसभेला उपस्थित राहणाऱ्या सदस्यांच्या उपस्थिती भत्त्यात घसघशीत वाढ केली आहे. प्रत्येक ग्रामसभेला उपस्थित राहणाऱ्या सदस्याला २०० रुपये भत्ता दिला जाणार आहे.
पंचायत राज व्यवस्थेत ग्रामपंचायत विकासाचा केंद्र बिंदू आहे. गावाच्या विकासाचे नियोजन गावातच व्हावे यासाठी ग्रामसभेला विशेष अधिकार देण्यात आले आहे. ग्रामसभेत बहुमताने ठरविलेली कामे केली जातात. मात्र बहुतांश गावांमध्ये ग्रामसभा म्हणजे केवळ सोपस्कर झाला आहे. गावकरीही उपस्थित राहत नाही. परिणामी शासनाच्या उद्देशाला तडा जातो. काही मोजकीच मंडळी गावाच्या विकासाचा निर्णय घेतात. हा प्रकार टाळण्यासाठी ग्रामविकास विभागाने पुढाकार घेतला आहे. सभेला उपस्थित राहणाऱ्या सदस्यांना मानधन देण्याचा निर्णय घेतला. परंतु सुरुवातीला नाममात्र २५ रुपये भत्ता दिला जात होता. त्यामुळे अनेक सदस्य मासिक सभेकडे पाठ फिरवित होते.
आपल्या मानधनात वाढ करावी, अशी मागणी त्यांनी केली होती. आता या मागणीत घसघशीत आठ पट वाढ झाली आहे. मासिक सभेला उपस्थित राहणाऱ्या सदस्यांना २०० रुपये मानधन दिले जाणार आहे. यात ७५ टक्के वाटा शासनाचा तर २५ टक्के वाटा ग्रामपंचायतीला उचलावा लागणार आहे. यासोबतच सरपंच व उपसरपंचांना देण्यात येणाऱ्या मानधनातही वाढ झाली आहे. ही वाढ गावच्या लोकसंख्येवर आधारित राहणार आहे. दोन हजार लोकसंख्या असलेल्या गावाला एक हजार रुपये, दोन ते आठ हजार लोकसंख्या असलेल्या गावाला दीड हजार रुपये तर आठ हजारापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावात दोन हजार रुपये मानधन मिळणार आहे. यातील ७५ टक्के वाटा हा शासन उचलणार आहे.
वर्षभरात कितीही सभा झाल्या तरी उपस्थित भत्ता केवळ १२ सभांसाठीच देण्यात येणार आहे. त्यामुळे सदस्य १२ ही सभांना उपस्थित राहिल्यास त्याला वर्षभराचे २४०० रुपये मिळणार आहे.
ग्रामविकासाचा केंद्रबिंदू असलेल्या ग्रामसभांच्या बळकटीकरणासाठी शासनाने हे पाऊल उचलले आहे. आता ग्रामसभांंना सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांसह गावकरीही मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, अशी अपेक्षा आहे.
यातून गावाचा निश्चितच विकास होणार आहे. यासाठी गरज आहे ती, गावकऱ्यांच्या आणि पुढाऱ्यांच्या इच्छाशक्तीची.

Web Title: Increment in the allowance of Gram Sabha members

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.