वीज पुरवठ्यात नादुरूस्त ट्रान्सफॉर्मरचा अडथळा
By Admin | Updated: September 10, 2016 00:59 IST2016-09-10T00:59:11+5:302016-09-10T00:59:11+5:30
नादुरूस्त ट्रान्सफार्मरमुळे शेतकऱ्यांना ओलित करताना अडचणी येतात. सद्या ट्रान्सफार्मरचा तुटवडा नाही.

वीज पुरवठ्यात नादुरूस्त ट्रान्सफॉर्मरचा अडथळा
बदलून देण्याचे आदेश : बारा तास वीज पुरवठ्याचे नियोजन
यवतमाळ : नादुरूस्त ट्रान्सफार्मरमुळे शेतकऱ्यांना ओलित करताना अडचणी येतात. सद्या ट्रान्सफार्मरचा तुटवडा नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी ट्रान्सफार्मर नादूरूस्त आहे, तेथे तातडीने दुसरे बदलवून द्या, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले. मुख्यमत्र्यांनी कृषीपंपांसाठी दररोज सलग बारा तास वीज देण्याची घोषणा केली. परंतु त्यामध्ये जिल्ह्यातील नादुरूस्त ट्रान्सफार्मर अडथळा ठरत आहेत.
महसूल भवन येथे पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील वीज व्यवस्थेचा आढावा घेतला, त्यावेळी त्यांनी हे आदेश दिले. बैठकीला जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंगला, वीज वितरणचे अधिक्षक अभियंता विजय भटकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांच्यासह वीज कंपनीचे कार्यकारी अभियंता व अन्य अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात नादुरूस्त ट्रान्सफार्मरच्या अनेक तक्रारी वारंवार प्राप्त होतात. ट्रान्सफार्मर नादुरूस्तीमुळे शेतकऱ्यांचे सिंचन बाधीत होते. सिंचनाची सुविधा आहे, परंतु वीज पुरवठा व्यवस्थित नसल्याने सिंचन करता येत नाही, अशी स्थिती ठिकठिकाणी निर्माण होत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या याबाबत तक्रारी प्राप्त होतात. जिल्ह्यात सध्या पुरेशा प्रमाणात ट्रान्सफार्मर उपलब्ध आहे. त्यामुळे अशी तक्रार प्राप्त झाल्यास २४ किंवा जास्तीत जास्त ४८ तासात नवीन ट्रान्सफार्मर लागले पाहिजे, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.
ट्रान्सफार्मर तातडीने बदलवून देता यावे यासाठी मुबलक प्रमाणात त्याचा साठा असणे आवश्यक आहे. त्यामुळे अतिरिक्त ट्रान्सफार्मर मागवून ठेवा. नादुरूस्त ट्रान्सफार्मर तातडीने दुरूस्त केले जावे, असेही पालकमंत्री यावेळी म्हणाले. शासनाने कृषि पंपांना सलग १२ तास अखंडीत वीज पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी तशी घोषणाही केली आहे. याचे चांगले नियोजन करण्याची सुचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी केली. सद्या उघाडीचे दिवस आहे. शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहे. अशा स्थितीत सिंचनासाठी अखंडीत वीज पुरवठ्यात अडचण होऊ नये, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनीही काही सुचना केल्या. अधिक्षक अभियंता विजय भटकर यांनी जिल्ह्याच्या एकूनच वीज व्यवस्थेची बैठकीत माहिती दिली. (प्रतिनिधी)