हेल्मेटची अंमलबजावणी शासकीय कर्मचाऱ्यांपासून
By Admin | Updated: February 12, 2016 02:56 IST2016-02-12T02:56:03+5:302016-02-12T02:56:03+5:30
शासनाने दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट सक्तीचे आदेश जारी केले असले तरी यवतमाळ जिल्ह्यात त्याची अंमलबजावणी आधी सर्व शासकीय कर्मचाऱ्यांपासून...

हेल्मेटची अंमलबजावणी शासकीय कर्मचाऱ्यांपासून
जिल्हा वाहतूक शाखेचा निर्णय : पोलीस अधीक्षकांचे सर्व शासकीय कार्यालयांना पत्र, दोन आठवड्यानंतर नियमित राबविणार ‘ड्रॉईव्ह’
यवतमाळ : शासनाने दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट सक्तीचे आदेश जारी केले असले तरी यवतमाळ जिल्ह्यात त्याची अंमलबजावणी आधी सर्व शासकीय कर्मचाऱ्यांपासून सुरू करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे.
मोटर सायकल चालक व मागे बसणाऱ्याला हेल्मेट सक्तीचे करण्यात आले आहे. न्यायालयापाठोपाठ शासनानेही या सक्तीची अंमलबजावणी सुरू केली. ग्रामीण महाराष्ट्रात सुरुवातीला औरंगाबाद व आता राज्यात सर्वत्र हेल्मेट सक्ती करण्याचा निर्णय परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी जाहीर केला. शासनाने तसा आदेशही काढला. त्यामुळे अनेक नागरिक कारवाईच्या भीतीने हेल्मेट घालून घराबाहेर निघताना दिसत आहेत. परंतु त्यांची संख्या अगदीच बोटावर मोजण्याऐवढी आहे. या हेल्मेट सक्तीबाबत नागरिकांमध्ये संभ्रमाची स्थिती पहायला मिळते. परंतु पोलीस प्रशासनाने कायद्याची अंमलबजावणी नागरिकांपासून करण्याऐवजी शासनाचा पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्या स्वाक्षरीचे पत्र सर्व शासकीय कार्यालयांच्या प्रमुखांना पाठविण्यात आले. आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्तीचे करावे, अशा सूचना त्यात देण्यात आल्या आहेत.
हेल्मेट खरेदी व अन्य बाबींसाठी सरकारी कर्मचाऱ्यांना दोन आठवड्यांचा अवधी दिला जाणार आहे. त्यानंतर प्रत्येक शासकीय कार्यालयाबाहेर सकाळी व सायंकाळी जिल्हा वाहतूक शाखेकडून ‘ड्राईव्ह’ राबविला जाणार आहे.
त्या-त्या कार्यालयाच्या फाटकावरच या कर्मचाऱ्यांना दंडीत केले जाईल. हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी पोलिसांनी स्वत:पाहून सुरू केल्याचे सांगण्यात आले. सर्व कर्मचाऱ्यांना हेल्मेट बंधनकारक करण्यात आले आहे. त्यात हयगय करणाऱ्यांना सुरुवातीला वॉर्निंग देऊन सोडून देण्यात आले.
परंतु आता पोलीस कर्मचाऱ्यांनाही आणि वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना आवर्जुन हेल्मेट नसल्यास दंड केला जात आहे. कर्मचाऱ्यांनंतर हेल्मेटचा मोर्चा नागरिकांकडे वळविला जाईल. (जिल्हा प्रतिनिधी)
हेल्मेट सक्ती सरकारी कर्मचाऱ्यांपासून सुरू करण्यात आली आहे. एसपींच्या स्वाक्षरीचे पत्र सर्व शासकीय कार्यालयांच्या प्रमुखांना पाठविण्यात येत आहे. हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी सर्वप्रथम पोलीस कर्मचाऱ्यांपासून सुरू करण्यात आली आहे. त्यांना दंडही ठोठावण्यात आला आहे.
- दिलीप चव्हाण,
पोलीस निरीक्षक, जिल्हा वाहतूक शाखा, यवतमाळ