ऐतिहासिक आझाद मैदान अतिक्रमणमुक्त करा
By Admin | Updated: June 10, 2016 02:28 IST2016-06-10T02:27:44+5:302016-06-10T02:28:59+5:30
यवतमाळातील ऐतिहासिक आझाद मैदानाला अतिक्रमणाचा वेढा पडला असून हे अतिक्रमण १०० टक्के व तत्काळ हटवा असे निर्देश जिल्हाधिकारी...

ऐतिहासिक आझाद मैदान अतिक्रमणमुक्त करा
जिल्हाधिकाऱ्यांचे एसडीओंना आदेश : नगरपरिषद, पोलिसांची मदत घेण्याच्या सूचना
यवतमाळ : यवतमाळातील ऐतिहासिक आझाद मैदानाला अतिक्रमणाचा वेढा पडला असून हे अतिक्रमण १०० टक्के व तत्काळ हटवा असे निर्देश जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी एसडीओ विकास माने यांना दिले आहे.
आझाद मैदानात चालणाऱ्या असामाजिक कृत्यांची गाथाच जिल्हाधिकाऱ्यांपुढे आली. आझाद मैदानात गुन्हेगारी कारवाया चालत असल्याने जीवाच्या भीतीने पुढे येऊन कुणीही लेखी तक्रार केली नसली तरी मौखिक तक्रारी मात्र प्रशासनाकडे मोठ्या प्रमाणात प्राप्त झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी त्यांनी यवतमाळचे उपविभागीय अधिकारी विकास माने यांना आझाद मैदानातील अतिक्रमण शंभर टक्के हटविण्याचे निर्देश दिले. त्यासाठी यवतमाळ नगरपरिषद आणि पोलिसांची मदत घेण्याच्या सूचनाही केल्या. स्थगनादेशाचा मुद्दा पुढे आला असता स्टे हा सौंदर्यीकरणाच्या कामाला आहे अतिक्रमणाला नाही, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चेअंती स्पष्ट केले.
आझाद मैदानाला ऐतिहासिक महत्व आहे. स्वातंत्र्य लढ्याची आंदोलने याच मैदानातून सुरू झाली. चौतीस कलम या नावानेही हे मैदान ओळखले जाते. परंतु ऐतिहासिक लढ्याची साक्ष देणाऱ्या या आझाद मैदानाला सध्या ग्रहण लागले आहे. अनेकदा मैदानात खेळणाऱ्या लहान-मोठ्या मुलांकडून जयस्तंभावर चढण्याचे व त्याची विटंबना करण्याचे प्रकारही घडले आहेत. बहुतांश मैदान हे खाद्य पदार्थ विक्रेत्या हातगाडीवाल्यांनी व्यापले आहे. चहा, शीतपेय विक्रीची दुकानेही तेथे आहेत. मैदानाचा काही भाग टॅक्सी, मेटॅडोअर, मालवाहू चारचाकी वाहनांच्या पार्किंगने व्यापला आहे. याच अतिक्रमणांचा आडोसा घेऊन आझाद मैदानात गुन्हेगारी कारवाया वाढल्या आहेत. टपोरी मुलांचा या मैदानात ठिय्या आहे. त्यामुळे तेथून महिला, विद्यार्थिनींना एकटे पायदळ जाणेही कठीण होऊन बसले आहे. अनेकदा तेथे छेडखानीचे व त्यातूनच मारहाणीचे प्रकारही घडले आहे. याच मैदानाच्या एका बाजूला असलेल्या निवासी अतिक्रमणामुळे गुन्हेगारांना आश्रय मिळतो आहे. चोरीतील माल दडपण्याचे प्रकार तेथे घडतात. अनेकदा पोलिसांनी तेथे धाडी घालून ‘सर्च’ही केला आहे. याच मैदानाच्या एका कोपऱ्यात अंमली पदार्थांची विक्री व तेथेच सेवन करण्याचे प्रकार सुरू असल्याची गंभीर बाबही जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे आझाद मैदानातील गुन्हेगारी व समाज विघातक कारवाया मोडून काढण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाला दिले आहे. ही जबाबदारी खास यवतमाळचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्यावर सोपविण्यात आली आहे. आझाद मैदान अतिक्रमणमुक्त करा, यवतमाळकरांना तेथे मुक्त श्वास घेऊ द्या, महिला-मुली कोणत्याही क्षणी तेथून ये-जा करू शकतील एवढी सुरक्षित भावना त्यांच्यात निर्माण करा, त्यासाठी गुन्हेगारी ठेचून काढा, अशा सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. अतिक्रमण हटविण्यासोबतच ते पुन्हा बसणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहे.
मीनाबाजारावरून नाराजी
यवतमाळकर नागरिकांचे हक्काचे खेळण्या-फिरण्याचे ठिकाण असलेल्या आझाद मैदानात महसूल विभागाने मीनाबाजारसाठी परवानगी दिल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. ही परवानगी दिलीच कशी असा त्यांचा सवाल होता. १० जूनपर्यंत हा मीनाबाजार चालणार आहे.
न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन
कोणत्याही खेळाच्या मैदानात कुठल्याच प्रकारचे अतिक्रमण होऊ नये असे स्पष्ट निर्देश उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे आहेत. मात्र त्यानंतरही यवतमाळच्या आझाद मैदानात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने नगरपरिषद, महसूल व पोलीस प्रशासनाच्या कर्तव्यदक्षतेवर प्रश्न लावले जात आहे. प्रशासनाच्या डोळ्यादेखत न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन सुरू आहे. त्यामुळे यवतमाळकर नागरिकांच्या आझाद मैदानातील खेळण्या-फिरण्याच्या हक्कावर गदा आली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
जयस्तंभाचे पावित्र्य व प्रतिष्ठा राखा
यवतमाळच्या आझाद मैदानाला वेगळेच ऐतिहासिक महत्व आहे. स्वातंत्र्य लढ्यातील महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, डॉ. राजेंद्रप्रसाद या सारख्या विभुतींची पायधूळ या मैदानाला लागली आहे. स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती म्हणून आझाद मैदानात जयस्तंभ उभारला आहे. परंतु या जयस्तंभाची सर्रास विटंबना केली जाते. कुणी तेथे आंघोळ करतो तर कुणी या जयस्तंभावर खेळण्यासाठी चढतो. लहान मुलांचा या जयस्तंभाला सतत वेढा असतो. म्हणूनच या जयस्तंभाचे पावित्र्य व प्रतिष्ठा राखण्यासाठी तो सुरक्षित स्थळी हलविण्याची सूचना खासदार विजय दर्डा यांनी केली आहे. याच जयस्तंभाच्या बाजूला २०० फूट उंच राष्ट्रध्वज उभारण्याची व त्यासाठी खासदार विकास निधीतून ३० ते ४० लाख रुपये उपलब्ध करून देण्याची तयारी विजय दर्डा यांनी काही महिन्यांपूर्वी पालकमंत्री संजय राठोड, यवतमाळचे आमदार मदन येरावार यांच्यासह आझाद मैदानाला दिलेल्या भेटीच्या वेळी व्यक्त केली होती. पालकमंत्री व आमदारांनी या सूचनेचे उत्स्फूर्तपणे स्वागत करीत त्या दृष्टीने कार्यवाहीचे निर्देश प्रशासनाला दिले होते. मात्र त्या प्रकरणात ठोस कारवाई होऊ शकलेली नाही.