आरोग्य यंत्रणा आजारी
By Admin | Updated: June 11, 2015 02:28 IST2015-06-11T02:28:19+5:302015-06-11T02:28:19+5:30
नागरिकांना गावापासून जवळच आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी यासाठी आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र सुरू करण्यात आले.

आरोग्य यंत्रणा आजारी
दिग्रस : नागरिकांना गावापासून जवळच आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी यासाठी आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र सुरू करण्यात आले. मात्र तालुक्यातील ही यंत्रणाच आजारी पडली आहे. परिणामी नागरिकांना खासगी रुग्णालयाकडे धाव घेवून आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. बहुतांश ठिकाणचे आरोग्य अधिकारी मुख्यालयी राहात नसल्याने कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या भरवशावर रुग्णालयाचा कारभार चालत आहे. यावर जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेचे कुठलेही नियंत्रण नाही.
मोठमोठ्या इमारतींमध्ये आरोग्य केंद्र, उपकेंद्र सुरू करण्यात आले आहे. त्याठिकाणी जवळपास सर्वच प्रकारच्या आजारावर उपचाराच्या सोयी आहे. औषधांचा पुरवठाही नियमित आणि आवश्यक तेवढा केला जातो. मात्र अधिकारी आणि कर्मचारी चांगली सेवा देत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. बहुतांश ठिकाणचे आरोग्य केंद्र तात्पुरता उपचार करून रुग्णाला इतर ठिकाणी हलविण्याचा सल्ला देतात. गंभीर रुग्ण तर दाखलही करून घेतले जात नाही. स्ट्रेचरवरच तपासणी केली जाते. बाह्य रुग्ण विभागात तपासणीसाठी आलेल्या रुग्णांना तासंतास डॉक्टरांची प्रतीक्षा करावी लागते. ग्रामीण भागातील नागरिक घरातील आणि शेतातील कामे आटोपून रुग्णालयात जातात. तेव्हा त्यांना कुणीही डॉक्टर उपलब्ध होत नाही. कनिष्ठ कर्मचारी तपासणी करतात. वेदनेने विव्हळणाऱ्या रुग्णांकडे लक्षच दिले जात नाही. विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांची वागणूक तुसडेपणाची असते. डॉक्टर केव्हा येणार याची विचारणा केल्यास उद्धट उत्तरे दिली जातात. शिवाय औषधोपचारही समाधानकारक केला जात नाही. बहुतांश कर्मचारीही तालुक्याच्या ठिकाणावरून ये-जा करतात. त्यांच्या सोयीने कामकाज सुरू केले जाते. इकडे रुग्ण तडफडत असतो तर कर्मचाऱ्यांची गप्पांची मैफल रंगलेली असते. अनेकजण तर मोबाईलवर मनोरंजन करत असतात. ही परिस्थिती तालुका पातळीवरील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही माहीत आहे. यानंतरही दखल घेतली जात नाही.
जवळच्या रुग्णालयात चांगले उपचार होत नसल्याने गरीब नागरिकांना नाईलाजाने खासगी उपचार घ्यावे लागतात. आधीच आर्थिक अडचणीत असताना रुग्णालयाच्या खर्चाचा भारही येवून पडतो. तपासणीची फी, डॉक्टरने लिहून दिलेली औषधांची लांबलचक चिठ्ठी पाहूनच तो गारद होवून जातो. मात्र त्यांना नाईलाज असतो. बरेचदा अपघाताचे रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले जातात. त्यांच्यावर तत्काळ उपचार होणे अपेक्षित असते. अशा रुग्णांवरही थातूरमातूर उपचार करून परत पाठविले जाते. (प्रतिनिधी)