झरी तालुक्याला जोडणारा रस्ता दुर्लक्षित
By Admin | Updated: June 27, 2015 00:35 IST2015-06-27T00:35:05+5:302015-06-27T00:35:05+5:30
घोन्सा-झरी मार्गाची अतिशय दैनावस्था झाली आहे. झरीजामणी या तालुक्याला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची अशी अवस्था आहे,

झरी तालुक्याला जोडणारा रस्ता दुर्लक्षित
वाहन चालक त्रस्त : एकपदरी रस्ता असल्याने वाहन ओव्हरटेकही करता येत नाही
झरी : घोन्सा-झरी मार्गाची अतिशय दैनावस्था झाली आहे. झरीजामणी या तालुक्याला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची अशी अवस्था आहे, तर ग्रामीण भागातील रस्त्यांचे काय हाल असतील, असा प्रश्न या मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांना पडतो. हा मार्ग एकपदरी असल्याने समारेच्या वाहनाला धड ओव्हरटेकही करता येत नाही.
गेल्या तीन ते चार वर्षांपूर्वी जामणीपर्यंत या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र काही वर्षांचा कालावधी लोटताच पुन्हा या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तालुक्याच्या ठिकाणी जाणाऱ्या रस्त्याचीच अशी दैनावस्था झाल्याने ग्रामीण भागातील रस्त्यांचा विचार न केलेलाच बरा. घोन्सा येथून झरी केवळ १८ किलोमीटर अंतरावर आहे. मात्र या रस्त्यावर जुनोनीपासून खड्डेच खड्डे पडले आहे. त्यामुळे खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा, अशी या रस्त्याची अवस्था झाली आहे. या मार्गावरील डांबर पूर्णत: उखडल्याने रस्त्यावर गीट्टी पसरली आहे. ही गट्टी अनेकदा एखादे मोठे वाहन आले की उसळून ती दुचाकीस्वाराला लागत असल्याच्याही घटना घडल्या आहे. असे असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागा मात्र केवळ डोळ्यावरच हात ठेऊन असल्याचे दिसून येते.
हा १८ किलोमीटरचा रस्ता आधीच अरूंद असल्याने एखाद्या वाहनाला ओव्हरटेक करताना अनेकदा वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन खाली आदळते. रस्त्याच्या मधोमध खड्डे पडल्याने तेथून मार्ग कसा काढावा, असा प्रश्न वाहन चालकांना पडतो. विशेष म्हणजे रात्री दुचाकीस्वारांची चांगलीच पंचाईत होते. या मार्गावर अनेक दुचाकी व चारचाकीस्वारांन उन्हाळ्यात वाघोबाने दर्शन दिले आहे. त्यातच रस्त्याचीही दैनावस्था झाली आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांना २० ते ३० च्याच वेगाने वाहन चालवावे लागत आहे. रात्री वाघाची दहशत व रस्त्याची दैनावस्था बघता अनेक दुचाकीस्वारांची भंबेरी उडते. यातच अनेक दुचाकीस्वारांचा अपघातही झाला आहे. खडकडोहजवळील एका नाल्यावरील पुलावर मधोमध तीन फूट लांबीचा खड्डा पडला आहे. या खड्ड्यात रात्रीच्या वेळी अनेक वाहने आदळत आहे. हा खड्डा अगदी पुलाच्या मधोमध असल्याने तो वाहन चालकांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे या पुलावर किरकोळ अपघात सतत घडतच आहे. त्याचबरोबर जुनोनी गावाजवळ तर रस्त्यावरील डांबरच गायब झाले आहे. तिथे फक्त गीट्टी पसरली आहे.
तत्कालीन आमदार वामनराव कासावार हे झरी तालुक्यातीलच होते. मात्र त्यांनीही त्यांच्या कार्यकाळात या रस्त्याच्या देखभाल व दुरूस्तीकडे लक्ष दिले नाही. महिन्यातून एक-दोनदा तरी ते या रस्त्याने ये-जा करीत होते. मात्र त्यांना रस्त्याची दैनावस्था आढळलीच नाही.
आता नवीन आमदारांनी तरी या रस्त्याच्या दुरवस्थेकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा आहे. सार्वजनिक बांधकाम विभागानेही या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी उपाययोजना करावी, अशी वाहन चालकांची मागणी आहे.
भूमिपूजन झालेली अनेक कामे थंडबस्त्यातच
विधानसभा निवडणुकीपूर्वी तालुक्यात भूमिपूजनांचा सपाटा सुरू होता. दररोज कुठे ना कुठे रस्ता, पुलांचे भूमिपूजन उरकले जात होते. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर त्यातील अनेक कामे अद्याप सुरूच झाली नाही. आता जुने आणि नवे, असा नवा वाद समोर येत आहे. काही जुन्या कामांना नव्याने मंजुरी देऊन कामे सुरू करण्यात येत आहे. यामुळे कामांवर मात्र परिणाम होत आहे.