विहिरीच्या नावाखाली पैसे मागितल्यास तक्रार नोंदवा

By Admin | Updated: June 3, 2015 00:06 IST2015-06-03T00:06:44+5:302015-06-03T00:06:44+5:30

शेतकऱ्यांना सिंचन विहीर मंजूर करून देतो, असे सांगून काही व्यक्ती त्यांच्याकडून पैसे उकळीत असल्याच्या

If you ask for money in the name of the well, file complaint | विहिरीच्या नावाखाली पैसे मागितल्यास तक्रार नोंदवा

विहिरीच्या नावाखाली पैसे मागितल्यास तक्रार नोंदवा

संजय राठोड : लाभार्थ्यांनी आर्थिक व्यवहार करू नये
यवतमाळ : शेतकऱ्यांना सिंचन विहीर मंजूर करून देतो, असे सांगून काही व्यक्ती त्यांच्याकडून पैसे उकळीत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. सिंचन विहीर पात्रतेनुसारच मंजूर केली जाते. यासाठी कोणत्याही प्रकारची रक्कम लाभार्थ्यांकडून घेतली जात नाही, अशा प्रकारची रक्कम कोणी मागत असल्यास त्याची तक्रार करा, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीत ते मंगळवारी बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्यांतर्गत धडक सिंचन विहिर योजना तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत अनुदानावर सिंचन विहीर मंजूर करण्यात येते. विहीर मंजूर झालेल्या शेतकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत रक्कम कोणत्याही शासकीय कार्यालयातून घेतली जात नाही, हे लाभार्थ्यांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. विहीर मंजूर करून देतो म्हणून कोणी पैसे मागत असल्यास सदर व्यक्ती आपणास फसवित आहे हे लक्षात घेवून तातडीने त्या व्यक्तीची तक्रार नोंदवावी.
शेतकरी सदर तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयातील रोजगार हमी योजनेच्या कार्यालयात तसेच संबंधीत उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी यांच्याकडे नोंदवू शकतात. शेतकऱ्यांना आपली विहिर मंजूर झाली हे कळण्यासाठी विहिर मंजूर लाभार्थ्यांच्या याद्या प्रत्येक ग्रामपंचायतीच्या ठिकाणी दर्शनी भागात लावण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनीही केल्या आहे. मंजूर यादीसह प्राधान्यक्रमाची यादीही लावल्या जावी, असे पालकमंत्र्यांनी बैठकीत सांगितले. विहिरीच्या नावाखाली पैसे मागणारी व्यक्ती आढळून आल्यास त्यावर कार्यवाही करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी बैठकीत केल्या. (प्रतिनिधी)

तक्रारींची दखल आवश्यक
विहिरींबाबतच नव्हे तर शासनाच्या विविध योजनांबाबत लाभार्थ्यांकडून तहसीलदार, जिल्हाधिकारी आणि सबंधित अधिकाऱ्यांकडे दररोज असंख्य तक्रारी येतात. परंतु या तक्रारींची वेळीच दखल घेतली जात नसल्याचा अनुभव लाभार्थ्यांचा आहे. याकडेही पालकमंत्र्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

Web Title: If you ask for money in the name of the well, file complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.