रुग्ण दगावल्यास मनुष्यवधाचा गुन्हा
By Admin | Updated: June 20, 2015 00:14 IST2015-06-20T00:14:56+5:302015-06-20T00:14:56+5:30
शासनाने सामान्य रुग्णांच्या सोईसाठी विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहे.

रुग्ण दगावल्यास मनुष्यवधाचा गुन्हा
मुख्यालयी राहणे बंधनकारक : गैरहजर डॉक्टरांवर होणार कारवाई
यवतमाळ : शासनाने सामान्य रुग्णांच्या सोईसाठी विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहे. या सुविधांचा लाभ त्यांना मिळणे आवश्यक आहे. मात्र ग्रामीण भागात केवळ डॉक्टर मुख्यालयी राहत नसल्याने आरोग्य सेवेत अनेक अडचणी निर्माण होतात. यापुढे प्रत्येकास मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे. ग्रामीण भागात डॉक्टर उपस्थित नसला आणि एखाद्या रुग्णाचा मृत्यु झाल्यास संबंधीत डॉक्टरवर थेट मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल, असे जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले.
बचत भवन येथे जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी तसेच महसूल पोलीस व संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक अखिलेश सिंग, अप्पर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांच्यासह संबंधीत विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी गैरकायदेशिरपणे होत असलेले गर्भलिंग निदान तसेच बोगस डॉक्टरांचाही आढावा घेतला. सामान्य रुग्णास चांगले आरोग्य सुविधा देण्यासाठी प्रत्येक शासकीय रुग्णालयात डॉक्टरांनी उपस्थित राहणे आवश्यकच असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. डॉक्टरच्या गैरहजेरीत रुग्ण दगावल्यास गुन्हा दाखल करण्यासोबतच प्रशासकीय कार्यवाहीही करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्ह्यात ठिकठिकाणी बोगस डॉक्टर असण्याची शक्यता आहे, अशा डॉक्टरांकडून रुग्णांच्या जिवाशी खेळ होवू नये. त्यामुळे येत्या १५ दिवसात जिल्हाभर बोगस डॉक्टरांचा गोपनीय पध्दतीने सर्वे करून अहवाल सादर करण्याचा सुचना केल्या. बोगस डॉक्टर आढळल्यास गुन्हा दाखल करण्यासोबतच त्याच्याकडे जे कोणते रजिस्ट्रेशन असतील ते कायमस्वरूपी रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.अनेकांकडे अॅलोपॅथीचे रजिस्ट्रेशन नसतांना ते अॅलोपॅथीची प्रॅक्ट्रीस करतात. अशी प्रॅक्टीसही यापुढे करता येणार नाही. बोगस डॉक्टर किंवा अशी अॅलोपॅथीची प्रॅक्टीस करत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी किंवा जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे तक्रार नोंदविण्याचे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
मुलाच्या हट्टामुळे अनेकदा गर्भलिंग निदान होण्याची शक्यता असते. यावर प्रतिबंध घालण्यासाठी येत्या १५ दिवसात विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत गेल्या दोन वर्षात झालेल्या गर्भपाताची माहिती घेतली जाणार आहे. सदर गर्भपातासाठी विशिष्ठ डॉक्टरकडे सोनोग्राफी व वैद्यकीय तपासणी केली असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधीत डॉक्टरवर चौकशीअंती कडक कार्यवाही केली जाणार आहे.
सर्व शासकीय रुग्णालयांसोबत खाजगी दवाखान्यात रिशेप्सन टेबलवर संबंधीत डॉक्टर, पोलीस स्टेशन, पोलीस कन्ट्रोलरुम येथील संबंधीतांचे मोबाईल व दुरध्वनी क्रमांक लावण्यासोबतच सीसीटीव्ही लावण्याच्या सुचना केल्या. अचानक भेटीत शासकीय रुग्णालयात संबंधीत मेडीकल आॅफीसर गैरहजर आढळल्यास डॉक्टरवर गुन्हे दाखल करण्याचे आदेशही त्यांनी बैठकीत दिले. (कार्यालय प्रतिनिधी)
बाहेरून औषधी सांगितल्यास तक्रार नोंदवा
कुत्रा किंवा साप चावल्यानंतर रुग्णांना द्यावयाचा इंजेक्शन व औषधांचा पुरेसा साठा सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय नेहमी लागणारी औषधही रुग्णांना बाहेरून आणावयाची आवश्यकता नाही. त्यानंतरही रूग्णालयांमध्ये डॉक्टर बाहेरून औषधी आणायला सांगत असल्यास संबंधीत डॉक्टरची तक्रार जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सकांकडे नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.