हुंडा नको, मामा फक्त पोरगी द्या मला !
By Admin | Updated: May 10, 2014 00:32 IST2014-05-10T00:32:37+5:302014-05-10T00:32:37+5:30
वधू पित्यांची पहिली पसंती सरकारी नोकरीतील मुलांनाच अधिक आहे. त्या खालोखाल खासगी नोकरी आणि व्यवसाय करणार्या तरुणांना पसंती दिली जाते.

हुंडा नको, मामा फक्त पोरगी द्या मला !
बिटरगाव : वधू पित्यांची पहिली पसंती सरकारी नोकरीतील मुलांनाच अधिक आहे. त्या खालोखाल खासगी नोकरी आणि व्यवसाय करणार्या तरुणांना पसंती दिली जाते. मात्र शेतकरी आणि त्यातही खेड्यातील सुशिक्षित बेरोजगार उपवर तरुणांना मात्र कुणीही भाव देताना दिसत नाही. त्यामुळे या तरुणांवर हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला असे म्हणण्याची वेळ आली आहे. बिना हुंड्यात लग्न करायला तरुण असला तरी वधू पिता मात्र दहादा विचार करताना दिसतो. सध्या लग्न सराईचा हंगाम सुरू आहे. प्रत्येक उपवर मुलींचा पिता सुस्वरूप आणि कमावता जावई शोधत आहे. गावागावात लग्नाच्या बोलणीसाठी बैठका सुरू आहे. मानपान, हुंडा आदी शब्द कितीही म्हटले तरी या बैठकीमध्ये चर्चेला येतच आहे. पूर्वी शेतकर्याला मुलगी देणारे पालक आता शेतकर्याच्या घरात मुलगी द्यायला तयार नाही. स्वत:ची २० एकर शेती असलेल्या उपवर मुलाला मुलगी देण्यापेक्षा शासकीय कार्यालयात चपराशाला मुलगी देणे पसंत केले जात आहे. शेतकर्यांच्या मुलाचा भाव लग्नाच्या बाजारात एकदम घसरला आहे. त्याला कारणही तसेच आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती पिकत नाही. त्यातच थोडे शिकलेले तरुण गावात फिरणे पसंत करतील परंतु शेतात पाय ठेवणार नाही. यामुळे शेतकर्यांची स्थिती नाजूक होत आहे. अशा परिस्थितीत वधू पिता आपल्या मुलीसाठी शेतकरी नवरा शोधताना शंभरदा विचार करतो. या उलट शहरात आणि नोकरीवर असलेल्या मुलाला मुलगी देण्यासाठी तो एका पायावर तयार असतो. नोकरीत असलेल्या तरुणाने मागेल तेवढी वरदक्षणा द्यायलाही तयार असतो. शिक्षक, तलाठी, पोलीस, वनरक्षक आदी नोकरीत असलेल्या तरुणांच्या मागे वधूपिते फिरताना दिसून येतात. त्यातच डॉक्टर आणि इंजीनअर असेल तर मग गोष्टच वेगळी. पुण्या-मुंबईत नोकरीवर असलेल्या इंजिनअरला मुलगी देणे सध्या ग्रामीण भागातच काय शहरी भागातही प्रतिष्ठेचे मानले जाते. आमचा जावई अमूक कंपनीत इंजिनअर आहे, असे अभिमानाने चार चौघात सांगितलेही जाते. यामुळे इतर पालकही अशा उच्चशिक्षित आणि शहरात राहणार्या नोकरीतील तरुणाला मुलगी द्यायला तयार असतात. तो व्यसनी आहे की निरव्यसनी याचाही विचार केला जात नाही. मुलगी ही पुण्या-मुंबईत राहायला मिळेल या विचाराने हुरळून जाते. अशा स्थितीत मात्र ग्रामीण भागात बेरोजगारीत राहणारे तरुण वधू पित्याची नकार घंटा ऐकत असतात. (वार्ताहर)