दाक्षिणात्य फायनान्स कंपन्यांकडून ‘शिकार’

By Admin | Updated: August 30, 2014 02:07 IST2014-08-30T02:07:49+5:302014-08-30T02:07:49+5:30

बँकांनी आधीच कर्ज दिले आणि शेतात पीक नसल्याने अधिकृत सावकार शेतकऱ्यांना कर्ज देत नाही ही बाब हेरुन दक्षिणेतील ..

'Hunting' from Southern Financial Companies | दाक्षिणात्य फायनान्स कंपन्यांकडून ‘शिकार’

दाक्षिणात्य फायनान्स कंपन्यांकडून ‘शिकार’

राजेश निस्ताने यवतमाळ
बँकांनी आधीच कर्ज दिले आणि शेतात पीक नसल्याने अधिकृत सावकार शेतकऱ्यांना कर्ज देत नाही ही बाब हेरुन दक्षिणेतील दोन डझनावर फायनान्स कंपन्या शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यात सक्रिय झाल्या आहेत. शेतकरी हे एकमेव टार्गेट या कंपन्यांचे असून तब्बल २२.५ टक्के दराने सहज कर्ज दिले जात आहे.
गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकरी कधी ओला दुष्काळ तर कधी कोरड्या दुष्काळाचा सामना करीत आहे. अनेकदा अतिवृष्टीने शेतातील पीक वाहून गेले. तर यावर्षी वेळेवर पाऊसच न झाल्याने कपाशी, तूर, सोयाबीन ही सर्व पिके बुडाली आहेत. जिल्ह्यातील १६ पैकी १४ तालुक्यांमध्ये शासनाने टंचाईसदृश स्थिती जाहीर केली आहे. गेल्या वर्षीसुद्धा संपूर्ण यवतमाळ जिल्ह्याची पीक आणेवारी केवळ ४६ टक्के एवढी होती. यावरून जिल्हाभरातील शेतकऱ्यांच्या एकूणच आर्थिक स्थितीचा अंदाज येतो.
शेतकरी आधीच कर्जाच्या खाईत लोटला गेला आहे. यावर्षी शेतकऱ्यांनी बँकांकडून पीक-पाण्यासाठी कर्ज घेतले. परंतु पीक बुडाले. तडजोड करून कित्येक शेतकऱ्यांनी दुबार-तिबार पेरणी केली. परंतु पाऊस लांबल्याने या तीनही पेरण्या उलटल्या. पुन्हा नवीन हंगामाची पेरणी करायची झाल्यास बँका कर्जासाठी उभे करीत नाही. तर शेतात पीकच होणार नसल्याने कर्ज कशाच्या भरोश्यावर फेडणार म्हणून अधिकृत सावकारांनी शेतकऱ्यांना कर्ज देणे बंद केले आहे. त्यामुळे संसाराचा गाडा चालवायचा कसा अशा विवंचनेत शेतकरी वर्ग सापडला आहे. पिके बुडाली, घर चालवायचे आहे, रितीरिवाज पाळायचे आहेत, सण-उत्सव काटकसरीने का होईना साजरे करायचे आहे. मात्र त्यासाठी पैसा नाही. शेतकऱ्यांच्या याच विवंचनेचा फायदा उठविण्याचा सपाटा दक्षिणेतील काही फायनान्स कंपन्यांनी सुरू केला आहे. शेतकरी आणि त्याच्या जमिनीचा सातबारा एवढेच टार्गेट या कंपन्यांचे आहेत. एकट्या यवतमाळ जिल्ह्यात दोन डझनापेक्षा अधिक फायनान्स कंपन्या आणि त्यांचे शंभरावर एजंट सक्रिय आहे. या एजंटांनी आतापर्यंत शेकडो शेतकऱ्यांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे ‘शिकार’ बनविले आहे. दक्षिणेतील या फायनान्स कंपन्यांच्या कर्जाचा व्याज दर अनधिकृत सावकारापेक्षाही कितीतरी अधिक आहे. आधीच कर्जाने पिचलेला आणि कंगाल झालेला शेतकरी आपण नेमकी कोणत्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करतो याची फारशी शहानिशा करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. सर्व काही लुटले गेले असल्याने आता आणखी काय लुटणार म्हणून सहज मिळणाऱ्या या कर्जासाठी शेतकरी कशावरही डोळे लावून स्वाक्षरी करण्यास तयार दिसत असल्याचे चित्र आहे. नाममात्र कर्ज देऊन व पुढे त्याच कर्जाआड शेतकऱ्याला व्याज चक्रात अडकवून त्याची जमीन हडपण्याचा दक्षिणेतील फायनान्स कंपन्यांचा मनसुबा दिसतो.
दक्षिणेतील या फायनान्स कंपन्यांनी आतापर्यंत यवतमाळ जिल्ह्यातील नेर व दारव्हा या दोन तालुक्यात मोठ्या प्रमाणात कर्ज वितरित केले आहे. याशिवाय अन्य तालुक्यांमध्येही या कंपन्यांचे एजंट फिरत आहेत.

Web Title: 'Hunting' from Southern Financial Companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.