हरणाचे शिकारी दोन महिन्यांपासून पसार
By Admin | Updated: September 14, 2016 01:21 IST2016-09-14T01:21:20+5:302016-09-14T01:21:20+5:30
येथील वन नाक्यावर दोन महिन्यांपूर्वी हरणाची शिकार करणारा शिकारी वन कोठडीतून पसार झाले होते.

हरणाचे शिकारी दोन महिन्यांपासून पसार
वन विभागातील दोषींना केवळ शोकॉज : वरिष्ठांकडून प्रकरण दडपण्याच्या हालचाली
उमरखेड : येथील वन नाक्यावर दोन महिन्यांपूर्वी हरणाची शिकार करणारा शिकारी वन कोठडीतून पसार झाले होते. अद्यापही शिकाऱ्याला पकडण्यात वन विभागाला यश आले नाही. याचा ठपका असलेल्या वन विभागातील पाच अधिकारी-कर्मचाऱ्यांवरही कोणतीच कारवाई झालेली नाही. केवळ शोकॉज देऊन प्रकरण थंडबस्त्यात ठेवले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे.
मराठवाड्यातील निवधा येथून १३ जुलैला दोन हरणाची शिकार करुन मोटरसायकलने पोत्यात घेऊन जात असताना वन नाक्यावर कर्मचाऱ्यांनी पकडले. त्यावेळी सोबतचे इतर चार आरोपी पसार झाले तर दिनेश जाधव रा. दिंडाळा ता. उमरखेड याला अटक करण्यात आली. त्याचेवर व इतर चार असे पाच जणांविरुद्ध वन विभागाने कार्यवाही केली. त्यामध्ये दिनेश जाधव याची सखोल चौकशी केली. त्यात त्याने शिकार केल्याचे कबूल केले व इतर चार आरोपीचे नाव ही सांगितले होते. वन कोठडीत ठेवण्यात आलेल्या दिनेश जाधवला हातकडी लावली होती. त्यासाठी चार वन कर्मचाऱ्यांना तैनात केले.
परंतु १४ जुलैच्या मध्यरात्रीला आरोपीने हातातील हातकडी टेबलावर ठेऊन दिनेश जाधव पसार झाला. यामुळे वन विभागात एकच खळबळ उडाली. या आरोपीची शोध मोहीम राबविली मात्र अजूनपर्यंत आरोपी मात्र सापडला नाही. या प्रकरणी उमरखेड येथील दरोगा अजय बावने, भारत भोरगे, अरविंद राठोड, जयेश कऱ्हाळे, उत्तम चव्हाण या पाच जणांना जबाबदार धरुन त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानंतर तत्कालीन उमरखेड वनपरिक्षेत्र अधिकारी तरटेकर यांंनी दोषी असलेल्या या पाच वन कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करून त्याचेवर कार्यवाहीसाठी अहवाल वरिष्ठांकडे तत्काळ पाठविला आहे. परंतु या प्रकरणातील आरोपी गेल्या दोन महिन्यांपासून सापडला नाही. तसेच याच प्रकरणातील वन विभागाच्या कर्मचारी यांचेवरही कुठलीच कारवाई वरिष्ठ अधिकारी यांचेकडून केलेली नाही.
पाच कर्मचारी, अधिकारी या प्रकरणात दोषी आढळून आलेले असतानाही मात्र कुठे माशी शिंकली माहीत नाही. कार्यवाही करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी यांनी पाहिजे ती गंभीर दखल घेतलेली नाही. उलट हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप होत आहे. कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (शहर प्रतिनिधी)