रुपांतरित कर्जापासून शेकडो शेतकरी वंचित
By Admin | Updated: September 3, 2014 23:45 IST2014-09-03T23:45:32+5:302014-09-03T23:45:32+5:30
गतवर्षी अतिवृष्टीने तर यावर्षी कमी पावसाने शेतकरी देशोधडीला लागला आहे. अशातच ३० जून रोजी कर्जाचे हप्ते पाडून रुपांतरित कर्ज वाटप करण्याचे ठरविण्यात आले. मात्र अद्यापही त्याची अंमलबजावणी झाली नाही.

रुपांतरित कर्जापासून शेकडो शेतकरी वंचित
महागाव : गतवर्षी अतिवृष्टीने तर यावर्षी कमी पावसाने शेतकरी देशोधडीला लागला आहे. अशातच ३० जून रोजी कर्जाचे हप्ते पाडून रुपांतरित कर्ज वाटप करण्याचे ठरविण्यात आले. मात्र अद्यापही त्याची अंमलबजावणी झाली नाही. जिल्ह्यातील शेकडो शेतकरी या रुपांतरित कर्जापासून वंचित असल्याचे दिसत आहे.
यंदा सुरुवातीपासून पावसाने दडी मारली. कसे बसे तग धरलेल्या पिकांवर किडींनी आक्रमण केले. सोयाबीन पिवळे पडत असून कापसाच्या उत्पादनातही मोठी घट येण्याची लक्षणे आहे. या संकटातून बाहेर काढण्यासाठी कोणतेच पॅकेज शासनाने घोषित केले नाही. उलट जिल्हा बँक रुपांतरित कर्ज वाटपाचे आश्वासन देऊन बसली असताना आता कुठे नाबार्ड आणि महाराष्ट्र बँकेकडे बोट दाखवित आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेने रुपांतरित कर्जाचे वाटप जिल्ह्यातील कोणत्याही शाखेत केले नाही. त्यामुळे अशा कर्जापासून जिल्हाभरातील ५० हजार शेतकरी वंचित राहिले आहे. जिल्हा बँकेत विचारणा केली तर नाबार्डकडून कर्ज पुरवठा झाला नसल्याने वाटप करता आले नाही, असे सांगितले जाते. नाबार्ड महाराष्ट्र बँकेला पत्रव्यवहार करण्यात आले असून अद्यापही सकारात्मक उत्तर आले नाही.
जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कर्ज पुरवठा झाला नसल्याने एकट्या महागाव तालुक्यात २८ सोसायट्यातील २९ हजार ११० सभासदांपैकी तीन हजार ४४७ सभासद वंचित आहे. सरासरी तालुक्यातील सदस्यांची आकडेवारी पाहता विविध कार्यकारी सोसायट्यातील ४८ हजार शेतकरी कर्जापासून वंचित राहिले आहे. अशा सभासदांकरिता आता बँकेने पुढाकार घेऊन काही तरी उपाययोजना करावी, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यास कुणालाही वेळ नसल्याचे दिसत आहे. (शहर प्रतिनिधी)