ग्रामीण भागातील शेकडो अपंग विद्यार्थी वाऱ्यावर
By Admin | Updated: September 22, 2014 23:35 IST2014-09-22T23:35:35+5:302014-09-22T23:35:35+5:30
उमरखेड पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद शाळा व इतर काही खासगी शाळांमध्ये शेकडो अपंग विद्यार्थी मोठ्याप्रमाणात शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी तसेच साहित्य

ग्रामीण भागातील शेकडो अपंग विद्यार्थी वाऱ्यावर
बिटरगाव : उमरखेड पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद शाळा व इतर काही खासगी शाळांमध्ये शेकडो अपंग विद्यार्थी मोठ्याप्रमाणात शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी तसेच साहित्य पुरविण्यासाठी तालुका समन्वयक, विषयतज्ञ, अपंग अध्यापन शिक्षक अशा दहा कर्मचाऱ्यांची नियुक्ती शासनातर्फे करण्यात आली आहे. परंतु हे कर्मचारी त्यांचे कर्तव्य गांभिर्याने बजावत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अपंग विद्यार्थ्यांचे मात्र मोठ्याप्रमाणात नुकसान होत आहे.
उमरखेड तालुक्यात तालुका समन्वयक व विषयतज्ञ म्हणून त्र्यंबक परवरे व अशोक गिरी यांची नियुक्ती केली आहे. तर फिरते विशेष शिक्षक म्हणून प्रमोद शिंदे, बालाजी बीचे, रंजना सावळे, गजानन जाधव, आदिनाथ जाधव, वैभव वाकडे, दीपक नेवरे, शरद आटे अशा दहा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु या सर्व कर्मचाऱ्यांचा संबंधित अपंग विद्यार्थ्यांना कोणताही लाभ होत नाही.
ग्रामीण भागातील शाळांमधील अपंग विद्यार्थ्यांना हे समन्वयक अथवा विशेष शिक्षक कधी देत नसल्याचे तक्रारी अपंग विद्यार्थ्यांच्या पालकांमधून होत आहे. अपंग विद्यार्थ्यांसाठी असलेले हे सर्व शिक्षक व तज्ञ दिवसभर पंचायत समितीमध्ये बसलेले आढळतात. शाळेला भेट देण्याची कधीकाळी त्यांची इच्छा झाल्यास ते उमरखेड शहरातीलच अथवा शहराजवळील एखाद्या शाळेला भेट देऊन थातूर-मातूर कर्तव्य पार पाडतात.
परंतु जंगल भागातील व तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या शाळांना हे कर्मचारी कधीही भेट देत नाही. त्यामुळे शासनाकडे अपंगांच्या कल्याणासाठी कितीही चांगल्या योजना असल्या तरीही त्या योजनांची अंमलबजावणी संबंधित यंत्रणेमार्फत योग्यरित्या होत नाही.
ही यंत्रणाच भ्रष्ट व बोगस आहे. यावर तालुक्यात शिक्कामोर्तब झालेला आहे. यासंदर्भात अनेक वेळा वरिष्ठांकडे तक्रारी करूनसुद्धा या गंभीर प्रकाराची दखलच घेतल्या जात नाही. त्यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांना वरिष्ठांकडूनच अभय असल्याचा आरोप पालकवर्गातून होत आहे. यामध्ये तालुक्यातील शेकडो अपंग विद्यार्थ्यांचा विकास मात्र खुंटला आहे. (वार्ताहर)