बारावीचा टक्का वाढला

By Admin | Updated: May 28, 2015 01:51 IST2015-05-28T01:51:34+5:302015-05-28T01:51:34+5:30

जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच बारावीच्या निकालाची टक्केवारी ९२.७७ इतकी राहिली आहे.

HSC percent increase | बारावीचा टक्का वाढला

बारावीचा टक्का वाढला

९२.७७ टक्के : उमरखेड, पांढरकवडा, झरी, दिग्रस, महागाव टॉप फाईव्हमध्ये
यवतमाळ : जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच बारावीच्या निकालाची टक्केवारी ९२.७७ इतकी राहिली आहे. जिल्ह्यातून सर्वाधिक ९५.८४ टक्के गुण घेत अँग्लो हिंदी हायस्कूलच्या विज्ञान शाखेतील सागर संजय नखाते या विद्यार्थ्याने बाजी मारली आहे. तर मुलींमधून जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूलच्या वाणिज्य शाखेतील हेमांगी अशोक कोठारी ही ९३.६९ टक्के गुण घेत अव्वल राहिली.
मागील वर्षीच्या ९०.८८ टक्के निकालाचा रेकॉर्ड यावर्षी ब्रेक झाला. जिल्ह्यातील २४ हजार ४५० विद्यार्थ्यांपैकी २२ हजार ६७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या निकालाने जिल्हाच निकालाच्या गुणवत्ता यादीत आला आहे. मागास तालुक्यातही भरघोस निकाल लागला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या तालुक्यांच्या निकालात वाढ झाली असून जिल्ह्याचा टक्का वाढला आहे.
बारावीच्या परीक्षेमध्ये जिल्ह्याच्या निकालाचा टक्का वाढला आहे. मागील वर्षी ९०.८८ टक्के निकाल लागला होता. यावर्षी यात तब्बल तीन टक्क्यांनी वाढ झाली असून ९२.७७ टक्के निकाल लागला आहे. शिवाय उमरखेड, पांढरकवडा, झरीजामणी, दिग्रस, महागाव या तालुक्यांनी टक्केवारीत पहिल्या पाचमध्ये स्थान मिळविले आहे. यावर्षीसुद्धा उत्तीर्ण होण्यात मुलीच वरचढ असून त्यांचे प्रमाण ९४.८४ टक्के इतके आहे. तर मुलांची टक्केवारी ९०.९० टक्के इतकी आहे. जिल्ह्यातील तालुक्यांच्या शाळांमध्ये निकालाची टक्केवारी भरघोस राहिली आहे. १०० टक्के निकालाच्या येथे ४४ शाळा तर १८१ शाळांचा निकाल ९० टक्क्यांच्यावर आहे. जिल्ह्यातून २४ हजार ४५० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी २२ हजार ६७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेच्या निकालाची टक्केवारी सर्वाधिक असून ८ हजार ३५६ विद्यार्थ्यांपैकी ८ हजार ८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.
वाणिज्य शाखेतील दोन हजार १६० विद्यार्थ्यांपैकी २ हजार ४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. कला शाखेतील १२ हजार ८६० विद्यार्थ्यांपैकी ११ हजार ६४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. होकेशनल अभ्यासक्रमाच्या एक हजार ७४ विद्यार्थ्यांपैकी ९०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. या निकालाचा जल्लोष सर्वत्र पाहायला मिळत होता. शाळा, महाविद्यालयात मात्र शुकशुकाट होता. मोबाईल अ‍ॅप्समुळे सायबर कॅफेमधीलही गर्दी यावर्षी कमी झालेली दिसून आली. बोर्डाची वेबसाईट नेहमीप्रमाणे हँग झाली होती. (कार्यालय प्रतिनिधी)
दिग्रसचा यश, यवतमाळची श्रेया ठरले विदर्भाचे टॉपर
दिग्रस येथील यश चांडक हा विद्यार्थी ९८ टक्के गुण मिळवून विदर्भातून पहिला तर महाराष्ट्रातून दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. यश याने नागपुरातून बारावीची परीक्षा दिली. मूळ यवतमाळची मात्र सध्या नागपूरच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी श्रेया साबू ही ९७.२३ गुणांसह विदर्भातून मुलींमध्ये टॉपर राहिली आहे. ती येथील डॉ.रवी आणि डॉ.जयश्री साबू यांची मुलगी आहे.

Web Title: HSC percent increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.